औरंगाबाद - पुणे महामार्गावरील गोदावरी नदी लगत असणाऱ्या टोंगवस्ती येथील शेख वजीर हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. यावेळी नातेवाईकांच्या लग्नासाठी गेल्याची संधी साधून दुपारी बाराच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला आहे. कपाटात ठेवलेली रोख 72 हजार रुपये व दागिने, असा एकूण एक लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![burglary in aurangabad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5937635_chori.jpg)
शेख वजीर हे दोन फेब्रुवारीला सकाळी पैठणला लग्नासाठी गेले होते. त्यांच्या नातेवाईकांचे लग्न असल्याने बँकेतून पैसे काढून आणले होते. याची संधी साधून सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान चोरट्यांनी एकूण एक लाख अकरा हजारांचा ऐवज लंपास केला. बाराच्या दरम्यान घराचे दार उघडे असल्याचे शेजाऱ्यांना लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ वजीर यांना माहिती दिली.
गंगापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अर्जुन चौधरी, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे संदीप डमाळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादवि कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधरी करत आहेत.