औरंगाबाद - गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे पैसे सभासद शेतकऱ्यांना परत मिळावेत आणि भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत. या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर औरंगाबाद पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची शुक्रवारी (दि. 4 डिसें.) घटना घडली आहे. क्रांतिचौक येथील साखर उपायुक्त कार्यालयावर आंदोलन सुरू असताना रस्तारोको करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांना बाळाचा वापर करावा लागला.
नेमके काय आहे प्रकरण ?
गंगापूर सहकारी साखर कारखाना 2007-2008 पासून बंद आहे. कर्ज थकीत असल्याने राज्य सहकारी बॅंकेने कर्जवसूली पोटी कारखाना विक्रीसाठी काढला होता. मात्र, त्यावेळी संचालक मंडळाने न्यायालयीन कारवाई सुरू केली होती. या कारवाईत न्यायालयात कारखान्याच्या वतीने 9 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. न्यायालयाने ती रक्कम कारखान्यात परत केली असून, ती व्याजासह 15 कोटी 75 लाख 33 हजार 338 रुपये एवढी झाली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांची असून, कारखान्याचे खाते गोठवल्याने आर्थिक व्यवहार बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे त्यांना मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी साखर उपायुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले होते.
आमदार बंबसह संचालक मंडळावर आहेत 'हे' आरोप
गंगापूर कारखान्याचे चेअरमन आमदार बंब व प्रभारी कार्यकारी संचालक बी. एम. पाटील यांनी संगनमताने बेकायदेशीररीत्या कारखान्याचे खाते उघडले. खाते उघडण्यासाठी ठराव घेण्यात आला होता. पण, हा ठरावसुद्धा बनावट आहे. कारखाना हे भागीदारीत फर्म असल्याचे दाखविण्यात आले. त्यात आमदार बंब आणि पाटील हे भागीदार आहेत, अशा प्रकारचा खोटा दस्तऐवज दाखवण्यात आल्याचा आरोप कृष्णा पाटील-डोणगावकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटल आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.2 डिसें.) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत. मुळात आरोप खोटे असून ते तत्काळ मागे घ्यावेत आणि शेतकऱ्यांचे पैसे परत करावे, अशी मागणी आंदोलक शेतकरी संतोष जाधव यांनी केली.
आंदोलन सुरू असताना पोलिसांनी केला बळाचा वापर
औरंगाबाद साखर उपायुक्त कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी गोठवलेली खाती खुली करून सभासदांचे पैसे द्या आणि आमदार प्रशांत बंब यांच्यावरील गुन्हे मागे घ्या, या मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलन सुरू असताना आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी अचानक रस्तारोको केला. पोलिसांनी वारंवार चेतावणी देऊनही वाहतूक अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी राज्य राखीव दल बोलावून शेतकऱ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी साखर सहसंचालक भेटल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. गोंधळ सुरू झाल्याने काही काळ औरंगाबाद शहरातील मुख्य क्रांती चौकामध्ये गोंधळ उडाला होता. शेतकरी आणि पोलिसांची पळापळ सुरू झाली. त्यानंतर आमदार प्रशांत बंब यांनी पोलिसांना भेटून पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला.
हेही वाचा - 'माझे मंत्रीपद गेले तरी चालेल, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही'
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचा 'समृद्धी महामार्ग' पाहणी दौरा, कार्यकर्त्यांना परवानगी माध्यमांना मात्र 'नो एंट्री'