औरंगाबाद - भाईचंद रायसोनी बँकेच्या फसवणुक प्रकरणी राज्यात अनेक ठिकाणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची छापेमारीचे सत्र सुरु केले आहे. त्यातच औरंगाबाद शहरातून नामांकित सहकारी बँकेच्या संचालकाला पुणे पोलिसांनी सकाळी साडे सहाच्या दरम्यान संशयातून ताब्यात घेतले आहे. अशी माहिती सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. अंबादास आबाजी मानकापे असे संचालकाचे नाव आहे.
पहाटे पासून राज्यात धरपकड -
पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने पहाटे पासूनच पुणे, जळगावात आणि औरंगाबाद येथे छापेमारी करत अनेक नामांकीत उद्योगपतीसह काही राजकारण्यांना ताब्यात घेतले आहे. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या १५ टीमकडून एकाच वेळी ही कारवाई झाली आहे. भाईचंद रायसोनी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी जळगाव आणि पुण्यात छापेमारी करत, जळगावचे प्रसिद्ध उद्योगपती प्रेम नारायण कोगटा, माजी मंत्री गिरीष महाजनांचे स्विय सहाय्यक जितेंद्र रमेश पाटील, भाजपाचे माजी नगरसेवक छगन झाल्टे, यांच्यासह औरंगाबादच्या आदर्श महिला बँकेचे चेअरमन अंबादास आबाजी मानकापे तसेच धुळे आणि मुंबई येथे छापे टाकत अनेक नामांकीत उद्योगपतींना ताब्यात घेतले.
बँकेची फसवणूक केल्याचा आहे आरोप -
जळगावच्या भाईचंद हिराचंद रायसोनी बँकेच्या फसवणूक आणि अपहार केल्याचा संशय आहे. भाईचंद बँकेत 1 हजार कोटीचा घोटाळा झाल्याची प्राथमिक माहिती असून या बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (औरंगाबाद येथून अटक), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोगटा (जळगाव, यांना पुण्यातील हॉटेलातून अटक) आणि प्रमोद किसनराव कापसे (अकोला) या लोकांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - बीएचआर प्रकरणी जळगावात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई, १२ जणांना अटक