अमरावती - खरीप हंगामाचा कालावधी अर्ध्यापेक्षा जास्त उलटूनही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नाही. यामुळे कर्जासाठी टाळाटाळ करणाऱ्या अमरावतीच्या तिवसा येथील भारतीय स्टेट बँक शाखेतील कृषी कर्ज विभागातील राजेश्वरी देशमुख या महिला अधिकाऱ्याला तिवस्याचे नगराध्यक्ष वैभव वानखडे व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले.
खरीप हंगामातील पिकांच्या परेणीसाठी व मशागतीसाठी शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे सर्व बँकाना आदेश आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा बँकांना तशा सूचना दिल्या आहेत. असे असून सुद्धा बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याच्या तक्रारी आहेत. अशाच प्रकारे तिवसा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील कृषी विभागातील अधिकारी राजेश्वरी देशमुख या शेतकऱ्यांना, वयोवृद्ध पेन्शनधारक अबाल वृद्धांच्या कर्ज प्रकरणांची दखल घेत नसून अशा नागरिकांना अक्षरशः हाकलून लावतात. पोलिसांच्या धमक्या देतात, अनेक कारणे सांगत उद्धट बोलून शेकडो शेतकऱ्यांच्या अंगावर त्रुटी असल्यास कागदपत्रे फेकून देतात, अशा घटना गेल्या महिन्यापासून नित्याच्या झाल्या असल्याच्या तक्रारी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी केल्या होत्या.
हेही वाचा - जामीन मंजूर...जे घाबरलेत त्यांना आणखी घाबरवणार; मनसे नेते जाधव यांची प्रतिक्रिया
त्यामुळे बँक व्यवस्थापक दिनेश राव यांच्याशी चर्चा करण्यासाठी व शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी नगराध्यक्ष वैभव वानखडे हे शेतकरी व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह बँकेत पोहचले. यावेळी देखील वरील प्रमाणे प्रकार सुरू होता, बँकेची वेळ संपली नसताना रांगेत लागलेल्या शेतकऱ्यांना सदर महिला अधिकारी हाकलून लावत होत्या. यावर नगराध्यक्ष व युवक काँग्रेसने आक्षेप घेत या अधिकारी मंडळीना जाब विचारला व शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी समज दिली. यावेळी घटनास्थळी तणाव निर्माण झाला. दरम्यान, बँक व्यवस्थापक यांच्या शिष्टमंडळाने या महिला अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यासोबतच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा - वीज केंद्रात जमिनी गेल्या अन् नशिबी आला संघर्ष; अखेर प्रकल्पग्रस्तांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा