अमरावती - पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हजारो कोटी रुपये उधळणाऱ्या भाजप सरकारचे पाप आम्ही जनतेसमोर आणू, असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सोमवारी काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाखाली नेमलेली ११ सदस्यांच्या समितीसह पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते.
काँग्रेसच्या या समितीचा दौरा आज पासून बुलडाणा जिल्ह्यातून सुरू होणार असताना समितीचे प्रमुख विजय वडेट्टीवार, आमदार रणजित कांबळे आणि काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे सोमवारी अमरावतीत आले होते. यावेळी विदर्भ दौऱ्याबाबत वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
विद्यमान भाजप सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण्यासाठी वर्षाला ५ हजार कोटी रुपये खर्च केले. असे असले तरी मागील २० वर्षांत जेवढा दुष्काळ महाराष्ट्रात पडला नाही, त्यापेक्षा भयावह परिस्थिती आता निर्माण झाली आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांची परिस्थिती भयावह आहे. राज्यातील परिस्थिती पाहता शासनाचे ५ हजार कोटी रुपये कुठे गेले, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
२५ कोटी रुपये खर्चून दुष्काळ निवरण्याचा मुख्यमंत्र्यांचा ड्रिम प्रोजेक्ट होता. मुख्यमंत्री आणि भाजपने केवळ बढाया मारण्याचे काम केले. आज कुठेही चारा छावण्या नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थिती पश्चिम विदर्भातील परिस्थिती नेमकी कशी आहे. या सरकारने काय पापं केली आहेत हे शोधून काढून आम्ही जनतेसमोर ठेवणार आहोत. बुलडाणा जिल्ह्यापासून आमचा दौरा सुरू होत असून पश्चिम विदर्भातील परिस्थितीचा संपूर्ण आढावा अमरावतीत आल्यावर आम्ही पत्रकारांसमोर मांडू, अशी माहिती त्यांनी दिली.