अमरावती : उद्धव ठाकरे सध्या दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी अमरावती आणि अकोल्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी राम मंदिरावरून भाजपवर निशाणा साधला.
'राम मंदिर सर्वोच्च न्यायालयामुळे उभारले जात आहे' : उद्धव ठाकरे म्हणाले की, राम मंदिर भाजपमुळे नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उभारले जात आहे. राममंदिर बांधले जात आहे ही चांगली गोष्ट आहे, मात्र राममंदिर उभारणीचा पाया आम्हीच घातला होता, असे ते म्हणाले. राममंदिराच्या मुद्द्यावरून भारतभर दंगली होत असताना स्वत:ला हिंदुत्ववादी सांगणारे उंदराच्या बिळात लपून बसले होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
'आमचे हिंदुत्व पाठीमागून वार करणारे नाही' : निवडणूक आयोगावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'तुम्ही आमचे निवडणूक चिन्ह आमच्याकडून काढून घेऊ शकता, पण आमच्या पक्षाचे नाव काढून घेऊ शकत नाही. कारण ते नाव माझ्या आजोबांनी दिले होते'. हिंदुत्वाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचे हिंदुत्व पाठीमागून वार करणारे नाही. ते पाण्यासारखे स्वच्छ आहे. आमचे हिंदुत्व विकारी नाही किंवा घातपाताचे नाही. एवढेच नाही तर ते फोडाफोडीचे राजकारण करणारे सुद्धा नाही, असे ते म्हणाले.
'राणा दाम्पत्याला घरी बसवले पाहिजे' : भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही आमच्याकडून सगळंच हिरावून घेतलं आहे. भाजपने आमचे सर्व काही हिसकावून घेतले आहे. माझ्याकडे काही एक उरले नाही. माझ्याकडे आता ना निवडणूक चिन्ह आहे, ना नाव आहे. पण माझे शिवसैनिक हीच माझी खरी ताकद आहे. या शिवसेनेच्या जोरावर मी अभेद्य उभा आहे, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिंदे-फडणवीस सरकार मध्ये अजित पवार गट सामिल झाल्याने त्रिशूल तयार झालेला आहे. परंतु या त्रिशुळामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची अवस्था दयनीय झाली असल्याचे ठाकरे म्हणाले. जिल्ह्यातील राणा दाम्पत्यावर टीका करताना, या नवरा बायकोला आता जनतेने घरी बसवले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा :