अमरावती - दिवसेंदिवस शहरांपासून ते ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सेफ्टी शौचालयाची निर्मिती होत आहे. या शौचालयतून बाहेर येणाऱ्या पाण्यामुळे डेंगू, मलेरिया, हिवतापसह आदी आजारांचे, डासांचे व दुर्गंधीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी असलेले अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील रवींद्र गणोरकर आणि संजय जोशी या दोन संशोधक मित्रांनी पाच दहा नव्हे तर तब्बल तीस वर्षे संशोधन करून इकोफ्रेंडली ग्रीन टॉयलेटची निर्मिती केली आहे. देशातील पहिलाच असा प्रकल्प असल्याचा दावा या संशोधकांनी केला असून या दोन्ही संशोधकांचा सन्मान संगनक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी अमरावती येथे त्यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात केला. प्रकल्पाचे कौतूक करत या संशोधकांनी निर्मिती केलेले इकोफ्रेंडली ग्रीन बायोटॉयलेट हे देशासाठी काळाची गरज असल्याचे मत संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आभासी पद्धतीने तर देवनाथ मठाचे पिठाधिश जितेंद्रनाथ महाराज यांसह आदी मान्यवर देखील उपस्थित होते.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील रवींद्र गणोरकर व संजय जोशी यांना तीस वर्षांपूर्वी इकोफ्रेंडली ग्रीन बायोटॉयलेट निर्मितीची संकल्पना सुचली होती. त्यासाठी त्यांनी तब्बल तीस वर्ष परिश्रम घेतले. कमी जागेत, कमीत कमी खर्चात, कमी पाण्यात या बायोटॉयलेटचा उपयोग करता येतो. या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा बायोटॉयलेट सहज नेता येतो. तसेच शेतीसाठी या शौचालयाच्या पाण्याचा वापर करता येतो जेणेकरून शेती सुपीक होईल. ग्रामीण भागातील या संशोधकानी तयार केलेल्या या प्रकल्पाला देशातील शासनाच्या नामांकीत संशोधक संस्थांनी परवानगी देऊन प्रमाणपत्र दिले आहेत.
इकोफ्रेंडली ग्रीन बायोटॉयलेटची निर्मिती हे प्रदूषण व रोगराईमुक्त भारत करण्याच्या संकल्पनेतून झाली असल्याचे या संशोधकांनी सांगितले. घरोघरी अशा प्रकारचे टॉयलेट लावल्यास लोकांचा खर्च वाचू शकतो. तसेच विविध रोगांना आळा घालता येऊ शकतो, असे या संशोधकानी संगीतले. तसेच घरी सेफ्टी शौचालयाची निर्मिती करायची झाल्यास मोठा खड्डा खोदावा लागतो. पण, यासाठी मोठा खड्डाही खोदावा लागत नाही.
हेही वाचा - विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता; शेतकऱ्यांची सोयाबीन कापणीसाठी लगबग