अमरावती - ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बरसल्यावर शांत झालेला पाऊस आता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुन्हा बरसायला लागला आहे. वरुड, चिखलदरा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला आहे. संपूर्ण जिल्ह्यात २४ तासात १०.०७ मी.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात १ जून ते २४ ऑगस्ट दरम्यान एकूण ५९४.०३ मी.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १२५०.०३ मी.मी. पाऊस चिखलदरा तालुक्यात बरसला आहे. तर, भातकुली तालुक्यात सर्वात कमी ३२७.०४ मी.मी. पाऊस झाला.
यावर्षी पावसाला 22 जूनपासून सुरुवात झाली होती. जून महिन्यात विशेष असा पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात मात्र संपूर्ण जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळला. अमरावती शहर आणि तालुक्यात ७ आणि ८ ऑगस्टला चांगला पाऊस बरसल्यावर ९ ऑगस्टपासून पावसाने उसंत घेतली. २० ऑगस्टपासून आकाशात पुन्हा ढगाळ झाल आणि अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. शनिवारी मात्र धारणी, चिखलदरा, परतवाडा तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. अमरावतीसह सर्वच तालुक्यत शनिवारी रात्री पासून रिमझिम पाऊस बरसतो आहे.
गत २४ तासांत अमरावती तालुक्यात २.५ मी.मी. पाऊस बरसला. भातकुली तालुक्यात २.६, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ६.०, धामणगाव रेल्वे तालुक्यत १.७, तिवसा तालुक्यात ५.४, मोर्शी तालुक्यात ११.८, वरुड तालुक्यत ३६.२, अचलपूर तालुक्यात १०.१, चांदूरबाजार तालुक्यात १६.८, दर्यापूर तालुक्यात ३.३, अंजनगाव तालुक्यात ६.२, धारणी तालुक्यात ८.२ आणि चिखलदरा तालुक्यात ३९.६ मी मि पाऊस बरसला. चांदूररेल्वे तालुक्यात मात्र ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. दरम्यान, जिल्हाभर पाऊल कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.