अमरावती - विदर्भातील संत्र्यांना विदेशात मागणी आहे. कोरोनासारख्या महामारीत शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी संत्र्याचा ज्यूस पिण्याचा सल्ला डॉक्टर देत आहे. अशा स्थितीत संत्र्यांच्या उत्पादनामधून मोठे उत्पन्न मिळविण्याची शेतकऱ्यांना संधी होती. मात्र, सततच्या वातावरण बदलाने व रोगामुळे हजारो हेक्टरवरील संत्राच्या बागा धोक्यात आल्या आहेत.
कोट्यवधी रुपयांचे संत्री मागील तीन महिन्यांपासून गळती लागल्याने संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. संत्रा गळतीवर उपाय सूचवण्यासाठी कृषी विभागाने तात्काळ पावले उचलून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
राज्यात सर्वाधिक विदर्भात १ लाख ५० हेक्टरवर संत्री फळ पिकांचे क्षेत्र आहे. यात पश्चिम विदर्भात ५५ हजार हेक्टरवर संत्र्यांचे उत्पादन घेतले जाते. परंतु सतत बदलत असलेल्या हवामानाचा संत्र्याच्या उत्पादनांवर परिणाम होत आहे. याचाच फटका हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे.
सध्या, अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील लाखो शेतकऱ्यांच्या शेतात संत्र्यांचा बहार फुललेला आहे. साधारणत: दिवाळीत संत्री बाजारपेठेत उपलब्ध होत असतात. परंतु मागील तीन वर्षांपासून वातावरणात होणारे बदल, पावसाचे बदलणारे प्रमाण व विविध रोगांचा होणारा प्रादुर्भाव यमुळे झाडांवरील संत्री ही गळून पडत आहेत.
संत्र्यांचे उत्पादन चांगले व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी यावर्षीही चांगली फवारणी व बगीचाची मशागत केली होती. पण जून, जुलैपासून सुरू झालेल्या संत्र्यांच्या गळतीने नवा उच्चांक गाठला आहे. संत्र्यांच्या बागेत संत्र्यांचा सडा पडून पडलेला दिसत आहे. त्यामुळे कृषी विभागाने यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
मागील वर्षी उन्हाळ्यात जमिनीतील भूजल पातळी खोल गेल्याने व दुष्काळ असल्याने विदर्भाचा कॅलिफोर्निया असलेल्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी तालुक्यातील हजारो हेक्टरवरील संत्र्याच्या बागा शेतकऱ्यांनी तोडून टाकल्या होत्या. नोटबंदीचा जबर फटका हा संत्री उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता .त्यात यावर्षीही मृग बहरात विक्रीसाठी येणारे संत्री हे टाळेबंदीत अडकले होते. बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी संत्री मातीमोल भावात विकले होते. संत्र्यांच्या आंबिया बहरावर शेतकऱ्यांची भिस्त होती. असा अंबिया बहारही गळून पडल्याने संत्री उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
जिल्ह्यातील मोझरी येथील संत्रा उत्पादक शेतकरी धिरज उमप यांनी परिस्थितीची माहिती सांगितली. ते म्हणाले, की मी खासगी कंपनीत नोकरी करत होतो. मात्र, नोकरी सोडून संत्रा शेती करत होतो. परंतु यात खूप भयावह परिस्थिती आहे. दररोज आंबिया बहाराची हजारो संत्री शेतात गळून पडत आहेत. शेतात गळलेले संत्रे आजपर्यंत उचलून फेकली आहेत.
गुरुदेव नगर येथील श्रीधर कुंभलकर या संत्रा उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात २७६ संत्र्यांच्या झाडे आहेत. यावर्षी सुरुवातीला चांगले संत्री होते. परंतु, त्यानंतर प्रचंड गळती सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्या शेताबाहेर संत्राचा ढीग लागला आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पाण्याचा निचरा होत नसल्याने संत्री गळती होत असल्याचे मत विभागिय कृषी अधिकारी डॉ. सुभाष नांगरे यांनी व्यक्त केले.