अमरावती - राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 2014मध्ये झालेल्या विधानसभा ( Minister Bacchu Kadu Property ) निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबई येथील सदनिकेची माहिती दिली नव्हती. त्यामुळे चांदूरबाजार कोर्टाने त्यांना दोन ( Chandur Bajar Court Sentenced Bacchu Kadu For 25 Thousand And Two Month Jail ) महिन्याचा कारावास आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र, राज्यमंत्री बच्चू कडू ( Miniter Bacchu Kadu ) यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे, याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. 2014 आणि 2019मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना बच्चू कडू यांनी सादर केलेल्या संपत्तीच्या विवरणानुसार बच्चू कडू यांच्याकडे 2 कोटी 98 लाख रुपयांची संपत्ती असून त्यांच्या पत्नी प्रा. डॉ. नयना कडू यांच्या नावे 1 कोटी, 10 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे स्पष्ट होते.
सदनिकेची माहिती दडविल्याने बच्चू कडू गोत्यात -
2014च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना बच्चू कडू यांनी मुंबई येथील सदनिकेची नोंद केली नव्हती. याबाबत 2017मध्ये आसेगाव पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध चांदूर बाजार येथील भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दिली होती. या तक्रारींचा संपूर्ण तपास केल्यावर दोषारोपपत्र चांदूरबाजार न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणाचा निकाल 11 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने दिला. न्यायालयाने या प्रकरणात बच्चू कडू यांना 25 हजाराचा दंड ठोठावत दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
पाच वर्षात वाढली एवढी संपत्ती -
2014च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना बच्चू कडू यांनी स्वतःचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 12 हजार आठशे रुपये आणि त्यांच्या पत्नी प्राध्यापक डॉ. नैना कडू यांचे वार्षिक उत्पन्न 4 लाख 97 हजार 190 रुपये नमूद केले होते. बच्चू कडू यांच्याकडे 17 लाख 49 हजार 359 रुपयाची जंगम मालमत्ता होती. बच्चू कडू यांनी स्वतः एकूण 17 लाख 50 हजार रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे नमूद असून वारसाहक्काने त्यांना 6 लाख 50 हजार रुपयांची मालमत्ता मिळाली असल्याचे नमूद केले होते. बच्चू कडू यांच्या पत्नी नैना कडू यांच्या नावे 3 लाख 46 हजार रुपयांची जंगम मालमत्ता, तर 14 लाख 34 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले होते. तसेच नैना कडू यांनी स्वकष्टाने पाच लाख 91 हजार रुपयांची संपत्ती मिळविल्याचे नमूद केले असून 2014 मध्ये दोघांचीही एकूण संपत्ती 90 लाख 70 हजार 359 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले होते.
2019मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना बच्चू कडू यांनी स्वतःचे एकूण उत्पन्न 17 लाख 66 हजार 935 रुपये नमूद केले असून प्राध्यापक डॉ. नयना कडू यांचे वार्षिक उत्पन्न 12 लाख 45 हजार 347 रुपये असल्याचे नमूद केले आहे. 2019मध्ये बच्चू कडू यांच्याकडे 30 लाख 81 हजार 284 रुपयांची जंगम मालमत्ता, तर 18 लाख 18 हजार 750 रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. तसेच स्वसंपादित एकूण एक कोटी एक लाख 11 हजार 284 रुपयांची मत्ता असल्याचे नमूद केले आहे. 2019मध्ये बच्चू कडू यांच्या नावे एकूण 2 कोटी 98 हजार रुपयांची संपत्ती असल्याचे स्पष्ट होते. तसेच प्राध्यापक डॉक्टर नैना कडू यांच्याकडे 38 लाख 13 हजार 495 रुपयांची जंगम मालमत्ता, तर 74 लाख 26 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद आहे. तसेच नैना कडू यांच्या नावे 1 कोटी 10 लाख 5 हजार 495 रुपयांची स्वसंपत्ती असल्याचे नमूद केलेले असून नैना कडू यांच्या नावे एकूण 2 कोटी 13 लाख 44 हजार 990 रुपयांची संपत्ती असल्याचे स्पष्ट होते. एकंदरीत पती-पत्नी मिळून कडू दाम्पत्याकडे एकूण 3 कोटी 11 लाख 45 हजार 63 रुपयांची संपत्ती असल्याचे स्पष्ट होते.
इतके आहे कर्ज -
2014मध्ये बच्चू कडू यांच्यावर बँकेचे एकूण 74 लाख 96 हजार रुपये कर्ज असल्याचे शपथपत्रात नमूद आहे. तर प्राध्यापक डॉ. नयना कडू यांच्यावर 20 लाख रुपयांचे कर्ज असल्याचे दाखविण्यात आले होते. 2019मध्ये बच्चू कडू यांच्यावर बँकेचे एकूण 90 लाख 81 हजार 96 रुपये, तर प्राध्यापक डॉ. नयना कडू यांच्याकडे बँकेचे एकूण 17 लाख 63 हजार 665 रुपये कर्ज असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
संपत्तीचा ग्राफ वाढला कसा?
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे कुठलाही उद्योग धंदा नाही. आमदार म्हणून त्यांना केवळ मानधन प्राप्त होते. तसेच त्यांच्या पत्नी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. नुसत्या मानधनावर बच्चू कडू नेमकी किती जणांची सेवा करतात, किती गरजूंना दान करतात आणि हे सर्व करत असताना त्यांनी इतकी संपत्ती नेमकी कुठून जमा केली. हे कळण्यासारखे नाही, असा आरोप बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार देणारे चांदूर बाजार येथील भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केला आहे. निवडणुकीच्या पूर्वी लोकांकडून एक एक रुपया जमा करायचा आणि निवडून आल्यावर कुठलाही उद्योगधंदा नसताना त्यांची संपत्ती नेमकी कशी वाढत आहे, हा खरोखरच संशोधनाचा विषय असल्याचेही गोपाल तिरमारे यांचे म्हणणे आहे. बच्चू कडू यांच्या संपत्तीचा ग्राफ नेमका कसा काय वाढत आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी देखील गोपाल तिरमारे यांनी केली आहे. मुंबई येथील सदनिके संदर्भात 2017मध्ये तक्रार केल्यावर बच्चू कडू यांनी म्हाडाकडे ही सदनिका विकण्याची परवानगी मागितली होती. म्हाडाने सुद्धा ही सदनिका विकण्याची परवानगी त्यांना दिली आहे. मात्र, या सदनिकेतबाबत बच्चू कडू यांनी अद्यापही खुलासा केला नसल्याचे गोपाल तिरमारे यांनी म्हटले आहे.