अमरावती - विदर्भाचा काश्मीर म्हणून चिखलदऱ्याची ओळख आहे. पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांना हमखास चिखलदऱ्याची आठवण होते. गेल्या दोन वर्षांपासून सबंध जगभरात कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे. या कोरोना संसर्गामुळे हे दोन वर्ष लॉकडाउमध्ये गेले आहेत. काही दिवसांपुर्वी हे लॉकडाउनचे नियम काही प्रमाणात शिथील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटक आता चिखलदऱ्याकडे जाताना दिसत आहेत. तसेच, शनिवार-रविवार तर या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. आता खूप दिवसानंतर हे पर्यटक घराबाहेर पडले आहेत. चिखलदऱ्यासारख्या निसर्गरम्य वातावरणात ते फिरण्यासाठी आले आहेत. तर, या सर्व वातावरणाबद्दल त्यांना काय वाटत याबाबात बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांनी...
पाच हजारापेक्षा जास्त पर्यटक
चिखलदाऱ्यामध्ये काल (शनिवार) आणि आज (रविवार) मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसली. या गर्दीमुळे चिखलदऱ्यातील हॉटेल, लॉज हे हाऊसफुल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचा ओढा हा चिखलदाऱ्याकडे असतो. चिखलदाऱ्यामधील सर्वच पॉईंटवर आता पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी गर्दी केली आहे. चिखलदऱ्यातील देवी पॉइंट, सायकल सफारी पॉइंट, उंट सफारी पॉइंट, तसेच, घोडा सफरीलाही मोठ्या प्रमाणावर पर्यटक पसंती देत आहेत. चिखलदऱ्यातील भीम कुंडातील मुख्य धबधबा प्रवाहीत झाल्याने तेथेही पर्यटक गर्दी करतायेत. मागील (शनिवार-रविवारी) मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी उसळली होती. तर, आज पुन्हा पाच हजारापेक्षा जास्त पर्यटक हे चिखलदऱ्यात दाखल झाले आहेत.
हॉटेलची भाडेवाढ
चिखलदऱ्यामध्ये शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणावर राज्यभरातील पर्यटक दाखल होतात. या पार्श्वभूमीवर येथील लॉज आणि हॉटेलने शनिवार रविवारी मोठ्या प्रमाणावर भाडेवाढ केली आहे. तसेच, सर्वच रेस्ट हाऊस हाउसफुल झाल्याचे चित्र चिखलदऱ्यात पाहायला मिळाले. दरम्यान, या आनंदी वातावरणात कोरोना नियमांची मोठ्या प्रमाणात पायमल्ली झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या राज्यात कोरोणाची दुसरी लाट ओसरली असली, तरी तिसरी लाट उंबरठ्यावर आहे असा तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमणात निर्बंध लागू केले आहेत. असे असतानाही अनेक पर्यटक मात्र चिखलदाऱ्यामध्ये कोरोना नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत.