अमरावती: संपूर्ण महाराष्ट्रात कॉफीचे उत्पादन घेणारे अमरावती जिल्ह्यात मेघाटातील चिखलदरा हे एकमेव ठिकाण आहे. 1820 मध्ये इंग्रजांनी सर्वात आधी चिखलदरा येथे कॉफीची केलेली लागवड यशस्वी झाली होती. त्यानंतर ख्रिस्ती मिशनरी आणि वनविभागाच्यावतीने कॉफीचे उत्पादन घेतले जाते. प्रकाश जांभेकर या आदिवासी शेतकऱ्याने आपल्या शेतात आंब्याच्या झाडांच्या सावलीत कॉफीचे उत्पन्न घेतले आहे. कॉफीमुळे समृद्धीची नवी वाट मेळघाटातील आदिवासी बांधवांना गवसली आहे.
अशी आली चिखलदऱ्यात कॉफी: समुद्रसपाटीपासून 3664 फूट उंचीवर सातपुडा पर्वत रांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. इंग्रज अधिकारी जेम्स मल्हेरन याने चिखलदरा येथे सर्वात आधी कॉफी रोपांची लागवड केली. केरळमधून आणलेल्या कॉफी रोपांची त्याने चिखलदरा येथील आपल्या मुल्हेरन कॉटेज नामक बंगल्याच्या परिसरात 1860 ते 1861 दरम्यान कॉफीची लागवड केली. आणि त्यांच्यामुळे चिखलदरा येथे कॉफी रुजली. 1897- 98 दरम्यान रोमन कॅथॉलिक मिशनची सुरुवात करून फादर भेवनेट यांनी सर्वात आधी रोजगार निर्मितीसाठी कॉफी संदर्भात विचार केला.
कॉफीच्या बागा आज देखील: चिखलदरा परिसरात मरियमपुर लगत 100 एकरात कॉफीची लागवड करण्यात आली. कॉफीचे उत्पादन वाढल्यावर चिखलदरा लगत सुमारे 240 एकरात कॉफीची लागवड करण्यात आली. चिखलदरा येथील उद्यान वनविभागाचे बंगले आणि विश्रामगृह परिसरासह मरियमपूर या गावालगत कॉफीच्या बागा आज देखील पाहायला मिळतात. इंग्रजांच्या काळात चिखलदरा येथील कॉफी तत्कालीन मद्रास येथील पोलसन कंपनीकडे पाठवली जायची. 1965 पर्यंत चिखलदरा येथून कॉफीचे ट्रक देशाच्या विविध भागात रवाना व्हायचे.
कॉफी उत्पादनाबाबत सकारात्मक विचारच नाही: चिखलदरा परिसरात कॉफीचे उत्पादन घेऊन इंग्रजांनी अनेक वर्ष रोजगार निर्मितीचे कार्य केले. इंग्रज गेल्यावर 1965 पर्यंत चिखलदरा येथील कॉफी देशभर जात होती. मात्र त्यानंतर या भागात कॉफीच्या उत्पन्नाकडे शासनाने फारसे लक्ष दिले नाही. 24 डिसेंबर 1996 ला कर्नाटक कॉफी बोर्ड चे संशोधन उपसंचालक ए जी सांभामूर्ती रेड्डी आणि केरळ कॉफी बोर्डाचे संशोधन उपसंचालक डॉ. टी राजू चिखलदरा येथे कॉफीच्या अभ्यासासाठी आले होते. चिखलदरा परिसरात अरेबिका कॉफीची लागवड सोयीची असल्याचा अभिप्राय त्यांनी नोंदवला होता. या भागातील आदिवासी शेतकऱ्यांना कॉफी लागवडीसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाला नाही. मात्र या भागात ख्रिस्ती मिशनरी आणि वन विभागाच्या वतीने कॉफीचे उत्पन्न सातत्याने घेतले जात आहे.
प्रकाश जांभेकर यांनी पहिल्यांदाच घेतले कॉफीचे उत्पादन: चिखलदरा लगत आमझरी परिसरात येणाऱ्या खटकाली या गावात प्रकाश जांभेकर या शेतकऱ्याने कॉफीचे उत्पादन घेण्यासाठी पुढाकार घेतला. सलग 8 वर्षांपासून त्याचे प्रयत्न सुरू होते. पहिल्या वर्षी केलेली कॉफीची लागवड यशस्वी ठरली. यानंतर प्रकाश जांभेकर यांनी आपल्या जमिनीवर आंबा आणि वडाची वृक्ष लावली. आंबा आणि वड ही दोन्ही वृक्ष वाढल्यावर 2 वर्षांपूर्वी या भागात पुन्हा एकदा कॉफीचे रोप लावले. आंबा आणि वर या दोन्ही वृक्षांच्या सावलीत गतवर्षी कॉफीच्या उत्पादनातून 60000 मिळाल्याचे प्रकाश जांभेकर 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. यानंतर पुन्हा नव्या जोमाने शेतात कॉफीचे रोप लावले. यावर्षी लाखाच्यावर उत्पन्न होईल, अशी अपेक्षा असल्याचे प्रकाश जांभेकर म्हणाले.
200 किलोचे उत्पादन: प्रकाश जांभेकर यांच्या शेतात सध्या दोन हजार कॉपीची झाडं आहेत. वर्षाला 2 वेळा 100 किलो असे एकूण 200 किलो कॉफीचे उत्पादन ते सध्या घेत आहेत. किलोमागे 1 हजार रुपये असा कॉफीला भाव आहे. ही कॉफी पूर्णतः सेंद्रिय असून कॉफीच्या वृक्षाला सर्वात आधी छोट्या आकारातील हिरवी फळ येतात. काही दिवसांनी ती लालसर होतात. ही फळ लाल झाल्यावर त्यांना सुकवले जाते. त्यानंतर त्यांना भाजल्या जाते भाजल्यावर ह्या फळांच्या वरचे साल काढल्या जाते. त्यानंतर त्यांना मिक्सरमधून किंवा चक्कीमध्ये दिसून त्याची पावडर तयार होते. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ही कॉफी पावडर आता तयार होईल, अशी माहिती वन्यजीव प्रेमी आणि कॉफी लागवड अभ्यासक माणिक धोटे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.