अमरावती: भारत जोडो यात्रेत शेतकरी, कामगार, कष्टकरी, तसेच सर्वसमवेशक जनता आणि धर्मनिरपेक्ष विचारांची पक्ष आणि संघटना सहभागी झाल्याने देशाच्या एकता आणि अखंडतेला बळकटी मिळाली आहे. मंगळवार 15 नोव्हेंबरला नवव्या दिवशी हिंगोली मार्गे भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) अमरावती विभागातील वाशीम मध्ये दाखल झाली.
राहुल गांधी यांचे सहर्ष स्वागत: यावेळी अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी राहुलजी गांधी यांचे सहर्ष स्वागत केले. यावेळी राहुल गांधी यांनी आ. सुलभाताई खोडके यांच्या खांद्यावर हात ठेवून 'कैसे हो ताईजी'...असे उद्गार काढले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराब देशमुख, कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या विचारांनी पुनीत झालेल्या आणि पुरोगामी विवेकी विचार, सामाजिक समता आणि संत परंपरा जपणाऱ्या अमरावती विभागात 'आपका स्वागत है'.... अशा शब्दात सुलभाताई खोडके यांनी राहुल गांधी यांचे सहर्ष स्वागत केले.
नव्या परिवर्तनाची नांदी: भारत जोडो यात्रेत शेतकरी, कामगार, कष्टकरी, तसेच सर्वसमवेशक जनता आणि धर्मनिरपेक्ष विचारांची पक्ष आणि संघटना सहभागी झाल्याने देशाच्या एकता आणि अखंडतेला बळकटी मिळाली आहे. यानिमित्ताने काँग्रेसची ताकद दिसून येत असून ही नव्या परिवर्तनाची नांदी असल्याची शुभकामना आमदार सुलभाताई खोडके यांनी यावेळी व्यक्त केली. आपणही या यात्रेचा एक भाग बनून आपल्या हजारो समर्थकांसह एकजुटीने यात्रेत सामील होत असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी राहुल गांधी समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले (Nanabhau Patole), आ. सुलभाताई खोडके आणि पदाधिकारींनी जनतेला हात उंचावित अभिवादन करताच उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता . यावेळी 'जात पात के बंधन तोडो , भारत जोडो -भारत जोडो' चा एकसूर निनादला होता . यावेळी राहुल गांधी यांच्या स्वागताकरिता मोठा जनसमुदाय देखील लोटला होता. तर आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात अमरावती मधून वाशीम मध्ये दाखल झालेले हजारो समर्थक सुद्धा भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांचे समवेत चालत होते.
18 नोव्हेंबरला शेगाव येथे राहुलजी गांधी यांची सभा: मंगळवार 15 नोव्हेंबर पासून अमरावती विभागातील वाशीम येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली असून पदयात्रा 15 ते १16 नोव्हेंबर दरम्यान वाशिम जिल्हा दोन दिवस , 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान अकोला येथे दोन दिवस आणि 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान बुलढाण्यातून ही यात्रा जाणार आहे. दरम्यान 18 नोव्हेंबर रोजी शेगाव येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा देखील होणार आहे . या सभेला महाविकास आघाडी मधील नेते आणि पदाधिकारी यांची विशेष उपस्थित राहणार असल्याने संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांचा पदयात्रेत सहभाग: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच वरिष्ठ नेते, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मंत्री अशोकराव चव्हाण, जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अमरावती विभागातील भारत जोडो यात्रेची विशेष जबाबदारी आ. सुलभाताई खोडके यांच्यावर सोपविली असून त्यांच्या नेतृत्वात अमरावतीच्या कानाकोपऱ्यातून समर्थकांचे जत्थेच्या जत्थे वाशीम मध्ये दाखल झाले आहे. भारतीयाच्या नव्या जडणघडणीचे शिलेदार होण्यासाठी आणि राहुल गांधी यांचे हात बळकट करून काँग्रेसची ताकद दाखवून देण्यासाठी अमरावती विभागातील भारत जोडो यात्रेत सर्व शेतकरी बांधव, कामगार, कष्टकरी, मजूर, महिला भगिनी, युवक बांधव तसेच सर्वसमावेशक जनता आणि धर्मनिरपेक्ष विचारांचे तमाम नागरिकांनी या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आ. सुलभा खोडके यांनी केले आहे.