अमरावती - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभर संचारबंदी असताना अमरावती शहरात अडकलेल्या बाहेरच्या अनेक प्रवाशांसह काही भटक्या लोकांना अमरावती महापालिकेच्या बेघर निवारा केंद्राचा आधार मिळाला आहे. बडनेरा रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर अमरावती महापालिकेने 2 वर्षांपूर्वी बेघरासाठी निवारा केंद्र उभारले आहे. आज हे निवारा केंद्र संचारबंदीत अडकलेल्या लोकांना सहारा देत आहेत.
एकूण 100 जणांना राहता येईल इतकी क्षमता या बेघर निवारा केंद्राची आहे. आज अमरावती शहरातील काही बेघर, भटके यांच्यासोबतच संचारबंदीमुळे अमरावती बस स्थानक तसेच बडनेरा रेल्वेस्थानकावर असकलेल्या प्रवाशांची रहाण्याची, जेवणाची अशी सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. संचारबंदी जोपर्यंत मागे घेतली जात नाही, किंवा अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या गावी पोहोचवण्याची काही व्यवस्था होत नाही, तोपर्यंत हे निवारा केंद्र नागरिकांची सर्व व्यवस्था करणार आहे.