अकोला - शहरातील हरिहर पेठ परिसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीच्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. पाईपलाईनमधील पाणी लिकेज होत असल्याने ते पाणी परिसरातील रहिवाशांच्या घरात साचत आहे.
गुडघाभर साचलेले पाणी उपसण्यासाठी येथील नागरिकांना रोज कसरत करावी लागत आहे. या भागाचे नगरसेवक राजेश मिश्रा यांनी यासंदर्भात तक्रारदेखील दाखल केली आहे. मागील चार महिन्यांपासून या गळतीसंदर्भात महानगरपालिकेचा आपत्तीनिवारण विभाग, महापौर आणि आयुक्तांकडे तक्रार नोंदवूनही कुठलीच कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
एकीकडे भर उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय होत आहे. तर दुसरीकडे अकोला शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई आहे. त्या भागातील नागरिक पाण्याच्या टाकीवर येऊन पाणी भरून घेऊन जातात. हा प्रकार सकाळ, संध्याकाळ नेहमीच पहावयास मिळतो. हरिहर पेठेतील पाण्याच्या टाकीतून हरिहर पेठ, वाशिम बायपास, गीता नगर, गंगानगर यासह आदी भागांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. गेल्या चार महिन्यांपासून या पाण्याच्या टाकीतील मोठ्या पाईपलाईनमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचरा होत आहे. पाईपलाईन नवीन बसवणे अशक्य असले तरी ती दुरुस्त करून पाण्याचा होणारा अपव्यय थांबवता येणे शक्य आहे.
या पाईपलाईनच्या दुरुस्तीचा प्रस्ताव स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीनंतर अजूनपर्यंत तयार झालेला नाही. परिणामी, हे पाणी पाण्याच्या टाकीच्या परिसरात साचत असून परिसरातील नागरिकांच्या घरात जात आहे. पाण्याच्या टाकी शेजारी राहणाऱ्या मकवाना यांच्या घरात अक्षरश: पावसाचे पाणी साचले की काय, असा प्रश्न पडतो. रोज सायंकाळी घरातील पाण्याचा उपसा करताना महिलावर्ग दिसून येतो. हा प्रश्न मनपा प्रशासन आणि महापालिकेतील सत्ताधारी निकाली काढू न शकल्याने स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.