अकोला - राज्यभरात त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चानंतर उडालेल्या जातीय तणावाच्या घटनांची मालिका राज्यात सुरू असतानाच अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका येथे ही सौम्य प्रमाणात जातीय तणावाची घटना घडली आहे. या कारणामुळे अकोट शहरात रविवारी संचारबंदी लावण्यात आली होती. मात्र, संचारबंदी सुरू असताना रविवारी मध्यरात्री शहरातील भंगार बाजार गल्ली येथील आठ दुकानांना आग लागल्याची घटना घडली. ही आग लावण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (Suspicion of burning eight scrap shops) घटनास्थळी पोलीस अधीक्षक व पोलीस पथक दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या अकोट शहरामध्ये शांततापूर्ण वातावरण आहे.
घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त -
जिल्ह्यातील अकोट शहर हे अति संवेदनशील शहर आहे. याठिकाणी हनुमान नगर येथे 14 नोव्हेंबरला काही अल्पवयीन मुलांनी दगडफेक आणि एका गाडीची तोडफोड केली होती. त्यानंतर अकोट शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी रात्री परत दगडफेक झाल्याच्या घटनेनंतर रविवारी सकाळपासून अकोट शहरात संचारबंदी लावण्यात आली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या देखरेखीखाली कायदा व सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न सुरू होते.
हेही वाचा - gadchiroli encounter : 16 नक्षलवाद्यांची ओळख पटली; 10 जणांची ओळख पटविणे सुरू
तसेच शनिवारच्या घटनेनंतर राज्य राखीव दलाची एक तुकडी ही तेथे तैनात करण्यात आली होती. मात्र, रविवारी मध्यरात्री परत शहरातील भंगार मार्केट येथे आठ दुकानांना आग लागली आहे. ही आग लावण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. तसेच ही आग नेमकी कोणी लवली, याचा शोधही पोलीस घेत आहे. परिणामी, या ठिकाणी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील अकोट शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.
दरम्यान, अकोला जिल्ह्यांमध्ये अतिसंवेदनशील परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अकोला शहरातील संवेदनशील भागांमध्ये राज्य राखीव दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहे. त्यासोबतच चौकाचौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून गस्तही वाढविण्यात आली आहे.