अकोला : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका पातूर तालुक्याला बसला आहे. 18 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीत पातुर तालुक्यातील 24 पेक्षा अधिक गावांतील पिके क्षतिग्रस्त झाली आहेत. तर जिल्ह्यातील 50 गावांतील 3,721 शेतकऱ्यांची 3,476 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, हरभरा, कांद्याचे तसेच उन्हाळी सोयाबीन, भुईमूग, ज्वारीसोबत फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सध्या 34 टक्के पंचनामे झाले आहे.
![Panchnama begins in hail-hit Patur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-01-serve-start-congress-leaders-visit-farm-mh10035_22032023112507_2203f_1679464507_459.jpg)
शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी : अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर सत्ताधारी पक्षाचे आमदार पोहोचले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश तायडे यांनी नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. शासनाने तत्काळ पंचनामे पूर्ण करावे व दोन ते तीन दिवसानंतर नुकसानभरपाईची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
![Panchnama begins in hail-hit Patur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-01-serve-start-congress-leaders-visit-farm-mh10035_22032023112507_2203f_1679464507_650.jpg)
महसूल विभागाकडून गारपीटग्रस्त भागाचा पंचनामा : संप संपल्यानंतर महसूल विभागाकडून गारपीटग्रस्त भागाचा पंचनामा करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत असला तरी आतापर्यंत फक्त 34 टक्केच पंचनामे झाले आहेत. हे पंचनामे तत्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या पंचनामांमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे दिसत आहे.
![Panchnama begins in hail-hit Patur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-01-serve-start-congress-leaders-visit-farm-mh10035_22032023112507_2203f_1679464507_161.jpg)
पिकविमा काढला नाही : दरम्यान, सध्या नुकसानग्रस्त भागातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचाच विमा काढल्या नसल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा पिकविमा काढल्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता कमी वाटत असल्याची शंका शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
![Panchnama begins in hail-hit Patur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-01-serve-start-congress-leaders-visit-farm-mh10035_22032023112507_2203f_1679464507_500.jpg)
शेतातील पिकांची गंजीही झाली खराब : अनेक शेतकऱ्यांनी शेतातील गहू, हरभरा हा काढून ठेवला होता. त्याची गंजी शेतातच लावली होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतात ठेवलेल्या हरभरा आणि गहू पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांना याचीसुद्धा नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश तायडे यांचा इशारा : शासनाने तत्काळ पंचनामे प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, तसेच शेतात गंजी लावून ठेवलेल्या पिकांनाही फटका बसल्याने यासंदर्भातही शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश तायडे यांनी केली आहे. अन्यथा काँग्रेस यासंदर्भात जन आंदोलन उभे करीत शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आक्रमक भूमिकासुद्धा घेईल, असा इशाराही काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश तायडे यांनी दिला आहे.
हेही वाचा : Mission Thackeray Failed: शिंदेंच्या आडून भाजपचे 'मिशन ठाकरे' फेल.. भाजपने पाठवले केंद्रीय नेतृत्वाला पत्र