अकोला - कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे निर्देश राज्य शासनाने जारी केले आहेत. पण याचा फटका रोजंदारी करणाऱ्या मजूरांना बसला आहे. कारण काम नाही, तर पगार नाही, अशी अवस्था मजूरांची झाली आहे.
जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे याला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाने कडक पावले उचलली आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. त्यासोबतच गर्दीची ठिकाणे म्हणजेच मॉल, चित्रपट गृह यासारखी ठिकाणे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. हे निर्देश गर्दी टाळण्यासाठी करण्यात आले आहेत. पण याचा फटका रोजंदारीवर काम करणाऱ्यांना बसला आहे.
पंधरा दिवस काम बंद राहणार असल्याने, या रोजंदारी मजुरांवर खायचे काय असा प्रश्न भेडसावत आहे. यामुळे शासनाने या मजूर वर्गाकडे लक्ष देऊन त्यांचा मजुरीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.