अकोला - आई कोरोनामुळे वारली असल्याची माहिती मुलाला दिल्यानंतर तो आईच्या अंत्यसंस्कारासाठी आला नाही. उलट त्याच्या आईवर मनपाने अंत्यसंस्कार करावेत, असे लिहून आईवरील 'प्रेम' त्याने क्षणाचाही विलंब न करता सोडून दिले. मुलगा त्याच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी येत नसल्याने मनपाचे आरोग्य विभाग प्रमुख यांनीच त्या अनोळखी महिलेचा मुलगा होवून तिच्यावर विधीवत अंत्यसंस्कार केले. याप्रकारामुळे मनपातील अधिकाऱ्यांनी सामाजिक भान जपले.
हेही वाचा - बाजारामध्ये कांद्याची मागणी वाढली, शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा
कोरोना महामारीत रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूची संख्याही वाढत आहे. कोरोनामुळे मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक हे शेवटच्या क्षणी स्मशानभूमीत जातात. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करून त्यांच्याप्रती आपली संवेदना व्यक्त करतात. परंतु, एका मुलाने चक्क आईचे अंत्यसंस्कार मनपाने करावे, असे लिहून देऊन आपल्या आईप्रति जबाबदारीच नव्हे, तर आई आणि मूल या नात्यालाही एका क्षणात तोडले आहे. तेही ती जिवंत नसताना. तिचे सौभाग्य की तिच्या जिवंतपनी असा दुर्दैवी क्षण तिला बघायला मिळाला नाही.
..तर मलाही कोरोनाचा प्रादुर्भाव होवू शकतो
दक्षिण झोनमध्ये राहणाऱ्या एका 60 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्या महिलेचा मृतदेह हा जावेद जकारिया यांच्या पथकाने मोहता मिल स्मशानभूमीत आणला. दुपारपासून त्या महिलेचा मृतदेह स्मशानभूमीत पडलेला होता. याची माहिती मनपा आरोग्य विभागाचे विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने चक्र फिरवीत या महिलेच्या मुलाचा शोध घेतला. त्या मुलाच्या घरी आरोग्य निरीक्षक यांना पाठविण्यात आले. त्या निरीक्षकांनी त्या मुलाला, तुमची आई वारली असल्याचा निरोप दिला. त्या मुलाने स्मशानभूमीत येत नसल्याचे सांगितले. तसेच, त्याने एक पत्रही त्या आरोग्य निरीक्षकास लिहून दिले. माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला मी जर आलो तर मलाही कोरोनाचा प्रादुर्भाव होवू शकतो. त्यामुळे, मनपानेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे. हे पत्र पाहून आरोग्य प्रमुख प्रशांत राजूरकर चक्रावून गेले. दुपारपासून आणलेल्या या वृद्ध महिलेवर सायंकाळ होत आली तरी अंत्यसंस्कार होत नसल्याने शेवटी राजूरकर यांनीच त्या वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करून सामाजिक बांधिलकी जपली.
आपली आई ही सर्वानाच प्रिय असते. शेवटच्या क्षणी आपण तिच्याजवळ राहू शकत नाही, तर यापेक्षा हे दुर्भाग्य काय असू शकते. त्या मुलाने तर फोन उचलनेही बंद केले होते. शेवटी तपास लावल्यानंतर तो मुलगा आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी येत नसेल तर हे घृणास्पद कृत्य आहे, अशी प्रतिक्रिया मनपाचे आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर यांनी दिली.
हेही वाचा - अकोल्यात 250 खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरू करा, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांचे आदेश