अहमदनगर - जिल्ह्यातील आरडगाव, टाकळीमिया, मोरवाडी येथील शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणकडून ट्रान्सफार्मर बंद केले. यामुळे शेतीच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खंडीत केलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यात यावे, या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्याला घेराव घालत आंदोलन केले आहे.
हे ही वाचा - 'महाराष्ट्रात उघड्यांना नागडे म्हणायचे व गुजरात, उत्तर प्रदेशमधील नागड्यांकडे डोळेझाक करायची'
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं. जोपर्यंत कट करण्यात आलेले वीज कनेक्शन जोडले जात नाही, तोपर्यंत महावितरण कार्यालयातून उठणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला असल्याने तातडीने ज्या शेतकऱ्यांंचे वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे. त्यांचे वीज कनेक्शन जोडण्याचे आदेश महावितरण अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.