अहमदनगर- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी नाकारत डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिल्याने गांधी समर्थक नाराज झाले आहेत. गांधी यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते आग्रही असून त्यासाठी येत्या रविवारी समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात खासदार गांधी यांनी ही निवडणूक अपक्ष लढवावी, असा आग्रह केला जाणार आहे.
स्वतः गांधी यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नसून गुरुवारी रात्री तिकीट नाकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते पुन्हा दिल्लीला गेल्याचे त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी सांगितले. सुवेंद्र यांनीही कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला असला तरी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून गांधी मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून योग्य तो निर्णय घेतील, असे म्हटले जात आहे. मेळावा हा कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे. दिलीप गांधी याच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी गाधींनी समर्थकांशी चर्चा केली.
तीनवेळा खासदार असलेल्या गांधींवर पक्षाने अन्याय केला; कार्यकर्त्यांची भावना
खासदार दिलीप गांधी हे तीन वेळेस मोठ्या मताधिक्याने आघाडीच्या उमेदवाराला हरवत निवडून आले. असे असताना ज्या उमेदवाराचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही. त्याला पक्षाने उमेदवारी देत स्थानिक कार्यकर्त्यांचा अपमान केल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. खासदार गांधींच्या मतदारसंघातील कामे आणि संसदेतील घेतलेल्या कामकाजातील सहभागामुळे त्यांना उत्कृष्ठ संसदपटूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, असे असताना त्यांना उमेदवारी नाकारल्याची खंत समर्थक व्यक्त करत आहेत.