नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारा मानाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार (Chhatrapati Shivaji Maharaj Vanshree Award ) २०१९ हा कोपरगाव येथील वृक्ष व पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांना जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय व्यक्तींमध्ये दूसरा तर नाशिक विभागाचा प्रथम अशा दोन पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे.
वर्तमान आणि भावी पिढ्यांचा विचार करून पर्यावरण वाचवण्यासाठी हा वृक्षप्रेमी आपल्यापरीने झटतो आहे. तो म्हणजे कोपरगांव जि.अहमदनगर येथील सुशांत घोडके. आजवर असंख्य वृक्षांना जगवणारा हा अवलिया झाडांसाठी रात्रंदिवस तत्पर असतो. कोपरगांव व शिर्डी परिसरातील ७९ गावांमध्ये शाळा, ग्रामपंचायती, पाड्या-वस्त्यांमध्ये त्यांने सुरू केलेल्या वृक्ष चळवळीमुळे ५० हजार वृक्षांचे पालकत्व घेण्यासाठी विद्यार्थी, नागरिक व ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत. त्याच्यांच मार्गदर्शन व प्रेरणेने पुणतांबा सारखे अनेक गावात पर्यावरण संवर्धनाच्या कामाने उभारी घेतली आहे.
शिर्डी उपविभागातील ग्रामीण भागासह कोपरगाव शहर आणि ग्रामीण भागातील ७९ गावात त्यांचे कार्य पहावयास मिळते. अनेक शाळांमध्ये वृक्षारोपण करुन त्यांचे जतन केले आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती करत वृक्षारोपण आणि पालकत्व अभियान यशस्वीपणे राबविले आहे."एक व्यक्ती-एक झाड-एक पालक" ही संकल्पना जोरदार राबविण्यात आली असून सुमारे ५० हजारांच्या पुढे रोपांचे वितरण, रोपण आणि पालकत्व दिले आहे. शिर्डी उपविभागासह बहुतांश शाळा महाविद्यालये यांचा सहभाग राहिला आहे.
![Shirdi Sushant Ghodke](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/shirdichhatrapatishivajimaharajvanshreeaward_21112022165149_2111f_1669029709_533.jpg)
वृक्षारोपणात नारळ, कडूलिंब, वड, पिंपळ, बेल, गुलमोहर, आवळा, कौठ, शिरस, कांचन, हादगा, बकान, रेन ट्री, कन्हेर, यासह आंबा, चिकू, पेरु, बदाम, सिताफळ, तुळस यासह दूर्मिळ जंगली, आयुर्वेदिक वनस्पती अशा अनेक झाडांचे रोपण करुन पालकत्व दिले आहे. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राज्यव्यापी वन महोत्सवाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र हरित सेना’ सदस्य नोंदणी अभियानात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे. मोफत रोप वितरण, वितरित रोपांचे रोपण आणि पालकत्व जागृती आणि कृतीशील उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्था, संघटना यांचा व्यापक सहभाग मिळवून दिला आहे.
![Shirdi Sushant Ghodke](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/shirdichhatrapatishivajimaharajvanshreeaward_21112022165149_2111f_1669029709_497.jpg)
श्री गणेश सार्वजनिक उत्सवादरम्यान किमान ११ झाडे आणि तीन वर्ष पालकत्व स्विकारणाऱ्या संघटनांचा सन्मान करण्याची अभिनव संकल्पना त्यांनी राबविली. या उपक्रमांस सार्वजनिक उत्सव मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बाल गणेश मंडळांना रोपांचे आणि झाडांच्या बियांचे वाटप करुन पर्यावरण विषयक बाल संस्कार रूजविण्याचे ते काम करित असतात. शैक्षणिक संस्था, प्रशासकीय कार्यालय परिसर, सर्व धर्मांची धार्मिक स्थळे, संतांचे आश्रम, सार्वजनिक मैदान, अमरधाम पासून ते कब्रस्तान पर्यंत केलेले वृक्षारोपण आणि पालकत्व व्यापक लोक सहभागातून यशस्वी केले. अनेक ठिकाणी बहरलेल्या झाडांचे नागरिकांना समाधान वाटून पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांचे ते कौतुक करतात.
![Shirdi Sushant Ghodke](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/shirdichhatrapatishivajimaharajvanshreeaward_21112022165149_2111f_1669029709_650.jpg)
पर्यावरणाचे मुलांना संस्कार व्हावे. तरुणांना या विषयाची गोडी लागावी म्हणून चित्रकला, प्रत्यक्ष निसर्ग चित्र स्पर्धा, रांगोळी स्पर्धां, वृक्षारोपण आणि पालकत्व बाबत घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन अनेक वर्षांपासून निरंतर करतात. त्यांनी वन महोत्सव, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत अनेक उपक्रम राबविले आहे. यात सहभागी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘वृक्षसंवर्धन’ आज्ञापत्र सहभागी प्रमाणपत्र सोबत दिले जाते. सार्वजनिक ठिकाणी असलेली कचरा कुंडी,काटेरी झुडपे हटवून तेथे वृक्षारोपण आणि सुशोभीकरण केले आहे. या कल्पकतेची दखल राज्यपातळीवर घेतली गेली आहे. निर्माल्य संकलन व त्या माध्यमातून खत निर्मिती करणे. असे उपक्रम राबविले आहेत.
![Shirdi Sushant Ghodke](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/shirdichhatrapatishivajimaharajvanshreeaward_21112022165149_2111f_1669029709_83.jpg)
राहाता तालुक्यातील पुणतांबा गावाला राज्य व विभागीय ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सुरुवातीच्या काळात या गावला वृक्षारोपण आणि संवर्धनाची गोडी लावत रोप उपलब्ध करून देत वृक्षारोपण अभियानाची मुहुर्तमेढ रोवली. आज हा आनंदोत्सव साजरा करतांना पुणतांबेकर वनश्री सुशांत घोडके यांचे ऋण व्यक्त करतात. शाळांचे मैदान, वसतीगृह, सार्वजनिक बगीचा आरक्षित जागा, रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले आहे. वनमहोत्सव, पर्यावरण दिन निमित्ताने वृक्ष दिंडी, जनजागृती फेरी, राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी ग्रामीण विद्यार्थ्यांना स्वच्छता - जलशक्ती - वृक्षारोपण आणि पर्यावरण यावर मार्गदर्शन केले आहे.
एखाद्या गावपातळीवर सार्वजनिक कार्य करणे जसे क्लिष्ट असते. तसे किंवा त्यापेक्षा अधिक पटीने एखादे शहर त्याला संलग्न शेकडो खेड्या-पाड्यात पोहचून लाखोंच्या लोकसंख्येत पोहचून सामाजिक, वृक्षारोपण चळवळ रुजविण्यासाठी खूप मेहनत लागते. ही किमया वनश्री सुशांत घोडके यांनी करुन दाखवली आहे. पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या भेटीत मिळालेली प्रेरणा, पद्मश्री पोपटराव पवार यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केलेल्या कामाची प्रशंसा आणि आदर्श ग्राम पाटोदाचे भास्कर पेरे पाटील यांनी समाजरत्न पुरस्काराने केलेला सन्मान यातच वनश्री सुशांत घोडके यांच्या कामाचा आवाका लक्षात येतो.
शासकीय कला महाविद्यालयाचे कला पदवीधर असलेले सुशांत घोडके हे उत्तम कलाकार असून त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कान्स पदक, कला उपासक पुरस्कार, कला व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा नाट्य मंदार पुरस्कार, वनमहोत्सव गौरव, जाणता राजा प्रतिष्ठानचा समाजरत्न पुरस्कार यासह अनेक नामांकित पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे. भारत सरकारचे ते स्वच्छतादूत आहेत. भारत सरकारच्या क्षेत्रिय प्रचार प्रसार कार्यालयाने ही त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
पुरस्काराबाबत आपल्या भावना व्यक्त करतांना सुशांत घोडके म्हणाले, ‘‘ छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने दिलेला वनश्री पुरस्कार हा माझे सोबत काम करणाऱ्या प्रत्येक वृक्ष व पर्यावरण प्रेमींचा हा सन्मान आहे. माझ्या अनेक सार्वजनिक कार्यात साथ देणारे आई- वडील, कुटुंबीय, वृक्ष मित्र, ज्ञात अज्ञात घटक. पर्यावरण प्रेमी नागरिक, शिर्डी उपविभागासह कोपरगांव तालुकावासियांना हा पुरस्कार समर्पित आहे.