अहमदनगर : कोपरगाव येथे राहणारे राजेंद्र खिलारी हे 5 मे रोजी कोपरगावहून छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. त्यांनी जाताना टोल भरला आणि येताना देखील कोपरगाव येथील कोकमठाणच्या टोलनाक्यावर फास्टटेगमध्ये पैसे शिल्लक नसल्याने सव्वाशे रुपये रोख दिले. तरी 8 मे रोजी त्यांची गाडी घरी उभी असताना त्यांना हडस पिंपळगाव टोल नाक्यावर 40 रुपये कट झाल्याचा संदेश प्राप्त झाला असल्याचे राजेंद्र खिलारी म्हणाले आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार : राजेंद्र खिलारी व सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव येथे जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावरील टोल नाका व्यवस्थापनाशी संपर्क केला. तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याने सदरची 40 रुपयाची रक्कम टोलनाका व्यवस्थापनाने चोरली असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केले. या संबंधित विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
तक्रार केल्यावर पैसे परत मिळणार : समृध्दी महामार्गाचे टोल वसुलीचे व्यवस्थापनाचे काम फास्टगो इन्फ्रा या प्रायव्हेट कंपनीला देण्यात आले आहे. राजेंद्र खीलारी यांचे 40 रूपये कसे कट झाले याबाबत शिर्डी जवळील कोपरगाव येथील टोल नाक्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांना यावर विचारणा केली. त्यांनी सदरचे पैसे हडस पिंपळगाव इथून कट झाले असून तेथे चौकशी करावी असे म्हटले आहे. तसेच तक्रार केल्यावर पैसे परत मिळणार असल्याचे देखील म्हटले आहे. तसेच एमएसआरडीसीचे टोलचे कामकाज बघणारे विजया शेनोए या महिला अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता जोपर्यंत तक्रारदार तक्रार दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही याबाबतची माहिती देऊ शकत नाही असे स्पष्ट केले आहे.
सर्वच प्रवाशी तक्रार करणार का ? : दरम्यान समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर प्रवाशांना कोणतीही पूर्व सूचना न देता पैसे कापतात कसे ? वाहन जर घरी उभे असेल तर पैसे कट करण्याचा संबंध काय ? तक्रार केल्यावर पैसे परत मिळणार असे म्हटले आहे. परंतु सर्वच प्रवाशी तक्रार करणार का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून एमएसआरडी सीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून टोल व्यवस्थापनाचा हा सावळा गोंधळ थांबवावा, अशीच मागणी यावेळी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे.