अहमदनगर - लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मंजुरीनंतर देशभरात ठिकठिकाणी विरोध प्रदर्शन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (सोमवार) नगर शहरात विविध डावे पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांच्यावतीने या कायद्याविरोधात विरोध प्रदर्शन करण्यात आले.
हेही वाचा - आदिवासी भागातील मुलांना पर्यावरणीय शिक्षणाचे धडे देण्याची गरज - लक्ष्मी मडावी
भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आरएसपी, फॉरवर्ड ब्लॉक, जीपीआईएमएल आदी पक्षाचे कार्यकर्त्यांकडून तिरंगा झेंडा हाती घेत विरोध प्रदर्शन आंदोलन करण्यात आले. शहरातील वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले.
सरकारच्या या कायद्यामुळे संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाला तिलांजली मिळणार असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. गरीब जनतेला या कायद्याने हद्दपार करण्याचा सरकारचा डाव असून लोकप्रिय घोषणा करून सत्तेत आलेले मोदी सरकार आता देशात पुन्हा चातुरवर्ण आणू पाहत आहे, जनतेच्या मूळ मुद्द्यांना बगल देत भावनिक मुद्द्यावर आरएसएसचा अजेंडा सरकार राबवत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलक नेत्यांनी केला. जोपर्यंत हा कायदा सरकार मागे घेणार नाही, तोपर्यंत सरकारविरोधात हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.