अहमदनगर - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात रहावी आणि लॉकडाऊन काळात कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी प्रशासन योग्य उपाय योजना करत आहे. अहमदनगर पोलीसही या काळात गोर-गरिबजनतेच्या मदतीसाठी सरसावले आहेत. त्यांनी मोमीन समाजातील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

मोमीन समाज हा रस्त्यावर शारिरिक कसरती आणि साहसी खेळ (ट्रक ओढणे, हाताने दगड फोडणे) सादर करून उपजीविका करतो. महाराष्ट्र शासनाने संपुर्ण राज्यात संचारबंदीचे आदेश दिले आहेत. अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडूनही सर्व नागरिकांना अत्यावश्यक सेवा वगळता घरात राहण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये कामआभावी अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट घोंगावत आहे. एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत असलेल्या अशा घटकांना मदत करण्यासाठी अहमदनगर पोलीस विभाग आणि अनेक सेवाभावी ग्रुप कार्यरत आहेत.
मोमीन समाजातील कुटुंबांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह मार्गदर्शनाप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपअधीक्षक संदीप मिटके, यांच्यासमवेत ट्रेक कॅम्पचे विशाल लाहोटी, संजय मानवेलीकर, विक्रांत नवले यांनी मंगळवारी मोमीन समाजबांधवांना उपजीविकेसाठी गहू, तांदूळ, तेल, डाळ आणि इतर किराणा व जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. उपाधीक्षक संदीप मिटके यांनी नागरिकांना संयम आणि शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले.