अहमदनगर - निळवंडे धरणातील पाण्याचे आवर्तन संगमनेरपर्यत सोडण्याच्या मागणीसाठी पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल ३ तास रास्ता रोको आंदोलन केले.
संगमनेर तालुक्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पिण्याचे पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र, विरोधी पक्ष ते राधाकृष्ण विखे यांनी निळवंडे-भंडारदरा धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनात हस्तक्षेप करत पिण्यासाठी सोडलेले पाणी संगमनेरपर्यंत पोहचू न देण्याचा निर्णय घेतला, असा आरोप करत संगमनेरमधील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
३ तासापेक्षा अधिक वेळ सुरू असलेल्या आंदोलनामुळे हतबल झालेल्या पोलीस प्रशासनाने अखेरीस आंदोलकांना अटक केली. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि विखे यांच्या दबावाला बळी पडत अकोलेपर्यंत पाणी देण्याचा निर्णय घेत तातडीने पाणी बंद केले, असा आरोप आंदोलकांनी केला. दरम्यान, पाटबंधारे खात्याने प्रवरा नदीत पाणी ओझर बंधाऱ्यापर्यंत सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले.