अहमदनगर - अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेवगाव येथे शहरातील क्रांतीचौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात मोदी सरकारने शेतक-यांना मदत करण्याऐवजी त्यांना देशोधडीला लावण्याचे धोरण घेतले आहे. अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई विम्याच्या जोखीम रकमेइतकी मिळावी अशी मागणी भाकपचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे यांनी केली आहे. अॅड. सुभाष लांडे, ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत कुलकर्णी आणि इतरांनीही आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात देशभरात ३०० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या अशी माहिती दिली.
मागण्या मान्य झाल्या नाही तर देशव्यापी आंदोलन
शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात अनेक महिन्यांपासून शेतकरी संघटना व डावेपक्ष आंदोलन करत आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी डावलून कंत्राटी व कॉर्पोरेट शेतीला फायदा होईल अशी धोरणे केंद्रसरकार राबवत आहे. तसेच ही धोरणे हमी भावाने शेतमाल खरेदी करण्याच्या विरोधातील आहेत. त्यामुळे बाजार समित्या बंद पडणार आहेत. परतीच्या पावसात हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, भात, कपाशी, भुईमूग, डाळी, द्राक्षे कुजून गेले. याबाबत गुंठ्याला १०० रुपये नुकसान भरपाई दिली जात आहे. ही शेतक-यांची थट्टा आहे. केंद्र सरकार विजेच्या दराबाबत नवे धोरण आणत असून कृषी वापर व व्यापारी वापर यात विजेचा दर एकच असल्याने ते शेतक-यांसाठी व जनतेसाठी अन्यायकारक ठरणार आहे, अशी माहिती अॅड. सुभाष लांडे यांनी दिली आहे. आज चक्का जाम आंदोलन केले मात्र २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही अॅड. लांडे यांनी या वेळी दिला.
हेही वाचा - फटाके बंदीचा प्रस्ताव बारगळला? मात्र फटाकेमुक्त दिवाळीसाठी जनतेला आवाहन
या वेळी झालेल्या आंदोलनात आत्माराम देवढे, मच्छिंद्र आर्ले, दीपक बढे, कडूमिया पठाण, संतोष गायकवाड, कारभारी वीर, राजू पोटफोडे, शिवाजी भुसारी, वैभव शिंदे, अविनाश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.