अहमदनगर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मढी यात्रेस सुरुवात झाली असून योग्य नियोजन केल्याचा देवस्थानने दावा केला आहे. चैतन्य कानिफनाथ यांची संजीवनी समाधी असलेल्या मढी गडावर रंगपंचमी ते पाडवा या दरम्यान महिनाभर यात्राउत्सव चालतो. राज्यासह परराज्यातील कानाकोपऱ्यातून भटक्या समाजाची हजारो भाविक मढीमध्ये या एक महिन्याच्या कालावधीत नाथांच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र रंगपंचमी हा नाथ समाधी दिन असल्याने या दिवशी नाथभक्तांची संख्या प्रचंड असते.
सध्या कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाने देवस्थानला विशेष सूचना देत काळजी घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे देवस्थानने भक्तांना एकाच दिवशी गर्दी न करता वेगवेगळ्या दिवशी मढीमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा गर्दीचे प्रमाण तुलनेत कमी दिसून आले.
हेही वाचा - सध्या राळेगणसिद्धीला येऊ नका; अण्णा हजारेंचा चाहत्यांना सल्ला
दरम्यान जिल्हाप्रशासनाने यात्रा-जत्रा यांच्या बरोबरच विदेशातून परतणाऱ्या जिल्हावासीयांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यात्रा-जत्रा असणाऱ्या ठिकाणी देवस्थान मंडळ आणि यात्रा कमिटीच्या प्रमुखांशी प्रांताधिकारी, तहसीलदार यांना संपर्कात राहून देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना काळजी न करता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.