अहमदनगर - केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याबाबत आज सोमवारी विधानसभेचे माजी सभापती व आमदार हरीभाऊ बागडे व खासदार डॉ. भागवत कराड यांनी हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेत अण्णांची मनधरणी केली, मात्र आपण आंदोलनावर ठाम असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले.
अण्णा आंदोलनावर ठाम -
केंद्र सरकारने नव्याने केलेल्या शेतकरी कायद्यांचीही माहिती हजारे यांना दिली. यावेळी हजारे यांनी दिल्लीतील आंदोलनाबाबत व नवीन कृषी कायद्यावर मी बोलणार नाही. मी माझ्या मागण्यावर ठाम आहे, असे सांगितले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, त्यासाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव (सी-टू प्लस फिफ्टी) सरकराने शेतकऱ्यांना द्यावा, कृषी मुल्य आयोगास स्वयत्तता द्यावी व भाजीपाला दुध व फळे यांनाही उत्पादन खर्चावर आधारित बाजार भाव दिला. तसेच ठिबक व तुषार सिंचनवर अनुदान दिले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असेही अण्णा म्हणाले.
भाजप नेत्यांकडून नव्या कायद्यांची माहिती-
कराड व बागडे यांनी केंद्र सरकारने नव्याने केलेल्या कृषी कायद्याची माहिती हजारे यांना दिली. नवे कायदे कसे शेतकरी हिताचे आहेत, हेही सांगितले. या वेळी त्यांनी कृषीसुधार विधेयकाची मराठी भाषेत रूपांतरित केलेली पुस्तिकाही हजारे यांनी माहितीसाठी दिली. या वेळी हजारे यांनी नव्याने केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यातील काही कायदे रद्द केले. तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी मी माझ्या मागण्यांवर ठाम आहे असे सांगितले.
कराड, बागडे यांनी दिले हे आश्वासन-
तुमची मागण्या योग्य व शेतकरी हिताच्या आहेत. तुमचे गाऱ्हाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे पोहच करू. मात्र सध्या तुम्ही आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ. तसेच लवकरच आपली एकत्रीत या विषयावर बैठकही लावू, अशे आश्वासन या वेळी बागडे व खासदार कराड यांनी दिले.