दुबई - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या स्थितीसाठी विराट कोहली जबाबदार असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना कोहलीने जबरदस्त कामगिरीकरून चाहत्यांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. त्या तुलनेत आयपीएलमध्ये खेळताना चांगली कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला. याचा थेट परिणाम बंगळुरूच्या संघावर झाल्याचे गावसकर म्हणाले.
काल अबुधाबी येथे झालेल्या एलिमनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून बंगळुरूला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे बंगळुरूचा संघ आयपीएलमधून बाहेर गेला आहे.
विराट कोहलीने आयपीएलच्या १३व्या हंगामात १५ सामन्यात १२१.३५च्या स्ट्राईक रेटने ४५० धावा केल्या आहेत. कोहलीच्या लवकर बाद होण्यामुळे बहुतांशी वेळा त्याच्या संघाला धावा जमवताना अडचणींचा सामना करावा लागला. देवदत्त पडिक्कल आणि अॅरॉन फिंचने सलामीवीरांची भूमिका अतिशय चोखपणे बजावली. मात्र, त्यानंतर येणाऱया कोहली आणि ए बी डिव्हिलियर्सची साथ त्यांना मिळाली नाही, असे गावसकर म्हणाले.
बंगळुरूच्या संघाने एक चांगला फिनिशर शोधला पाहिजे. शिवम दुबेच्या रुपात तो त्यांच्याकडे आहेही फक्त त्याला संधी दिली गेली पाहिजे. त्याच्याकडे जबाबदारी दिली गेली पाहिजे. त्याला त्याची भूमीका स्पष्ट झाली तर तो नक्कीच चांगला खेळ करेल, असेही गावसकर म्हणाले.