मँचेस्टर - शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या व उत्कंठावर्धक ठरलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला. या पराभवाबरोबरच विश्वविजेतेपदाचे भारताचे स्वप्न भंगले आहे. या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. या कामगिरीमुळे टीम इंडियाचे साहाय्यक प्रशिक्षक आणि फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे.
टीम इंडियाचे विश्वकपमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि साहाय्यक स्टाफच्या करारात 45 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, बांगर यांच्याबद्दल असे काही करण्यात आलेले नाही. स्पर्धेमध्ये बांगर यांना अधिक चांगले प्रदर्शन करता आले असते असे मत बीसीसीआयने व्यक्त केले आहे.
उपांत्य सामन्यामध्ये भारताची सुरुवात खूपच खराब झाली. तुफान फॉर्मात असलेला रोहित शर्मा व कर्णधार कोहली प्रत्येकी १ धाव काढून बाद झाले. त्यानंतर सलामीवीर के.एल. राहुलही एक धाव काढून बाद झाल्याने भारतावर दडपण आले. हार्दिक पांड्या व (३२ धावा) पंतने (३२) काही आकर्षक फटके खळून सामन्यातील आव्हान जिंवत ठेवण्याचा प्रयत्न केला. दोघे बाद झाल्यानंतर धोनी व जडेजाने विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र दोघांची झुंज अपयशी ठरली व भारताला न्युझीलंडकडून १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागून स्पर्धेतील गाशा गुंडाळावा लागला.