मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. रोहितशिवाय, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू मारियाप्पन थांगावेलू, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल या खेळाडूंचीही भारताच्या सर्वोच्च क्रीडा सन्मानासाठी शिफारस करण्यात आली आहे.
राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन आणि अन्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या निर्णयाबद्दल राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीची आज मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रोहितपूर्वी, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या क्रिकेटपटूंना खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. रोहित शर्माची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाल्यास हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरू शकतो. १९९८मध्ये खेलरत्न पुरस्कार मिळवणारा सचिन हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. २००७मध्ये भारताला टी-२० विश्वविजेता बनवल्यानंतर धोनीने तर, २०१८मध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूसमवेत विराट कोहलीने हा पुरस्कार पटकावला होता.
गेल्या चार वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीच्या जोरावर हा पुरस्कार देण्यात येतो. प्रशस्तीपत्र, शाल याव्यतिरिक्त खेळाडूला 7.50 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते.
२०१९च्या विश्करंडक स्पर्धेत रोहितने ६४८ धावा करत दमदार कामगिरी नोंदवली होती. महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने २०१९च्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवली. मनिकाने २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदक तर, २०१८च्या एशियन गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले. वर्ल्ड पॅरा-अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवल्यानंतर, मारियाप्पन पुढच्या वर्षीच्या पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. भारतीय महिला हॉकी संघाने राणीच्या नेतृत्वात गतवर्षी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता दर्शवली आहे.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीत माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, माजी हॉकी कर्णधार सरदारसिंग, माजी पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक, माजी टेबल टेनिसपटू मोनालिसा बरुआ मेहता, बॉक्सर वेंकटेशन देवराजन, क्रीडा भाष्यकार अनिश बटाविया आणि पत्रकार आलोक सिन्हा आणि नीरू भाटिया यांचा समावेश आहे.