मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीवर खूश असल्यामुळे मुख्य प्रशिक्षक आणि साहाय्यकांच्या करारात वाढ होण्याचा आग्रह काही दिवसांपूर्वी प्रशासकीय समितीने धरला होता. मात्र, तरीही बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. लवकरच या पदासाठी जाहिरात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर नवीन प्रशिक्षकाचा शोध बीसीसीआय करणार असल्याच्या शक्यता बळावली आहे. भारताच्या विंडीज दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळू शकतो. जर पात्र उमेदवार न भेटल्यास रवी शास्त्री यांना मुदतवाढ मिळून विंडीज दौऱ्यात भारतीय संघासोबत कायम राहतील.
शास्त्री यांच्यासह गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचाही करार जुलै महिन्याच्या अखेरीस संपणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर भारतीय संघ विश्वचषकात सेमीफायनलपर्यंत मजल मारली तर शास्त्री प्रशिक्षक पदावर कायम राहू शकतील. रवी शास्त्री हे अनिल कुंबळे यांच्या जागेवर आले होते. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने ७१ वर्षानंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशात एकदिवसीय मालिका जिंकण्यात संघाला यश आले.