कोलकाता - ईडन गार्डन्स येथे भारत विरूद्ध बांगलादेश या उभय संघात ऐतिहासिक दिवस रात्र कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्याला सर्व क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. बुद्धिबळच्या दुनियेचा राजा असलेल्या मॅग्नस कार्लसन यानेही या 'पिंक बॉल टेस्ट'साठी उपस्थिती नोंदवली होती. या सामन्यानंतर, कार्लसनने आपला अनुभव सांगितला आहे.
हेही वाचा - 'मागच्या सहा वर्षांपासून मला कोणीही प्रायोजक नाही', बॉक्सिंगपटू मनोज कुमारची खंत
या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा अव्वल बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसनने मैदानातील घंटा वाजवून खेळाचा आरंभ केला. 'त्यावेळी आनंदने ती बेल वाजवली आणि मी तसाच उभा राहिलो. तेव्हा मी 'मुर्ख' दिसलो. क्रिकेटविषयी आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे', असे कार्लसनने म्हटले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान कार्लसनने आपला अनुभव सांगितला.
कार्लसन आणि आनंद यांच्यासमवेत बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (सीएबी) सचिव अविषेक डालमिया हे उपस्थित होते. भारताने ही कसोटी एक डाव आणि ४६ धावांनी जिंकली. वेगवान गोलंदाजांनी केलेल्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारताने ही कसोटीत तिसऱ्या दिवशीच खिशात घातली आहे.