चेन्नई - मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलमध्ये तब्बल नवव्यांदा आपला सलामीचा सामना गमावला आहे. शुक्रवारी बंगळुरूने मुंबईचा २ गडी राखून पराभव केला. पण, या पराभवाचे शल्य कर्णधार रोहित शर्माच्या जिव्हारी लागलं नाही. कारण त्याच्या म्हणण्यानुसार, पाच वेळचा विजेत्या संघासाठी पहिला सामना नव्हे तर स्पर्धेचे विजेतेपद जिंकणे महत्वाचे आहे.
आयपीएल २०२१ च्या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झाला. या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. तेव्हा मुंबईने २० षटकात ९ बाद १५९ धावा जोडल्या. बंगळुरूने हे लक्ष्य शेवटच्या चेंडूवर २ गडी राखून पूर्ण केले. दरम्यान, मुंबई संघाने आयपीएलमध्ये नवव्यांदा सलामीचा सामना गमावला. या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सांगितलं की, आमच्यासाठी पहिला सामना नाही तर स्पर्धेचे विजेतेपद जिंकणे महत्वाचे आहे.
उभय संघातील सामना चांगला झाला. आम्ही त्यांना सहजासहजी विजय साकारू दिला नाही. आम्ही आणखी २० धावा करण्यात अपयशी ठरलो. काही चूका होतात, यामुळे असे घडतं. या गोष्टींना मागे सोडून पुढे वाटचाल करायला हवी. चेन्नईची खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती. आम्हाला आता पुढील सामन्याबाबत विचार केला पाहिजे, असे देखील रोहित म्हणाला.
हेही वाचा - IPL 2021 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी सलामी; मुंबई इंडियन्सचा पराभव
हेही वाचा - IPL २०२१ : पंतसमोर दिग्गज धोनीचे आव्हान, चेन्नई-दिल्ली यांच्यात आज लढत