वेलिंग्टन - भारतीय संघासाठी बुधवारचा दिवस निराशाजनक ठरला. भारताने एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला पाणी पाजल्यावर टी-२० मालिकेत भारताची पराभवाने सुरुवात झाली. भारताचा असा पराभव होईल असे कुणालाच वाटले नव्हते. पहिल्या टी-२० सामन्यात ८० धावांनी पराभव झाला. या विजयाचा हिरो ठरला तो युवा यष्टीरक्षक टिम सीफर्ट. त्याने ४३ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८४ धावांची खेळी केली. त्याच्या या धुव्वाधार खेळीमुळे त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला.
२४ वर्षीय टिम सीफर्टचा जन्म १४ डिसेंबर १९९४ साली झाला. त्याला फक्त ९ टी-२० तर ३ एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याची कालची खेळी पाहता त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव कमी आहे असे वाटतही नव्हते. सीफर्टने टी-२० मध्ये मागील वर्षीच वेलिंग्टनमध्ये पदार्पण केले होते. मध्यक्रमात खेळणारा सीफर्ट गुप्टिलच्या दुखापतीनंतर सलामीला खेळण्यास आला.
यापूर्वी त्याने ८ सामन्यात केवळ ४२ धावा केल्या होत्या. पण भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो काही वेगळा विचार करुन मैदानात उतरला होता. त्याने आक्रमक खेळी करत भारतीय गोलंदाजी लय बिघडून टाकली.
सामनावीरचा किताब घेताना सीफर्ट म्हणाला, की मालिकेची सुरुवात शानदार झाली. माझ्या या खेळीनं संघातील खेळाडू खूश आहेत. पहिली २ षटके मी सांभाळून खेळलो. त्यानंतर गोलंदाजांवर प्रहार करण्यास सुरुवात केली आणि गोलंदाजावर दबाव टाकण्यास सुरुवात केली.