कटक - भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माला वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात २२ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. विशाखापट्टणमच्या दुसऱ्या सामन्यात रोहितने १५९ धावांची दणकेबाज खेळी केली होती. त्यानंतर आता त्याला श्रीलंकेचा सलामीवीर सनथ जयसुर्याचा २२ वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.
सनथ जयसुर्याने १९९७ मध्ये, सलामीवीर म्हणून एका वर्षांत सर्वाधिक २३८७ धावा केल्या होत्या. तर रोहित शर्माला हा रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी ९ धावांची गरज आहे.
![india vs west indies : rohit sharma on the verge of breaking sanath jayasuriya 22 year old record](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5455987_klkk.jpg)
रोहितने या वर्षी सलामीवीर म्हणून २३७९ धावा केल्या आहेत. रोहितने २०१९ या वर्षात एकदिवसीय सामन्यात १४२७, टी-२० त ३९६ आणि कसोटीत ५५६ धावा केल्या आहेत.
भारत आणि वेस्ट इंडीज संघात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. विंडीजने पहिला सामना तर भारताने दुसरा सामना जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. तिसरा आणि निर्णायक सामना आज कटकच्या मैदानात खेळला जाणार आहे. भारतीय संघ आजचा सामना जिंकून विंडीजविरुद्ध सलग १० वी मालिका जिंकण्याच्या उद्देशानं खेळ करेल. तर विडींजच्या संघाला भारताला घरच्या मैदानात पराभूत करण्यासाठी संधी आहे. मात्र, विंडीजला अद्याप १३ वर्षांपासून भारतात मालिका जिंकता आलेलं नाही.
हेही वाचा - टीम इंडियाची १० व्या मालिका विजयावर नजर, तिसरा निर्णायक सामन्यासाठी संघ सज्ज
हेही वाचा - ४ सामन्यात फक्त ३४ धावा!..वाचा बाराबती स्टेडियमवर कॅप्टन कोहलीचा इतिहास