मँचेस्टर - इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान, पाकचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने आयसीसीच्या एका नियमांचा भंग केला. त्याने सामन्यादरम्यान, असे काही कृत्य केले की, जे नियमाबाहेर होते. त्यामुळे त्याला पंचांनी समज दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयसीसीने काही नियमावली तयार केली आहे. यात गोलंदाजांना चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. जर असे कृत्य जाणूनबूजून केल्यास विरोधी संघाला ५ धावा बहाल करण्यात येणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात आमिर चेंडूला लाळेने चकाकी आणताना दिसून आला.
नेमक काय घडलं -
मँचेस्टरच्या मैदानात उभय संघात पहिला टी-२० सामना खेळवण्यात आला. यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा चौथे षटक घेऊन मोहम्मद आमिर गोलंदाजासाठी आला. त्याने या षटकादरम्यान, चेंडूला चमकवण्यासाठी लाळेचा वापर केला. गंभीर बाब म्हणजे, त्याने या षटकातील सर्व चेंडू टाकण्याआधी चेंडूला लाळ लावली.
पुढील षटक संपल्यानंतर पुन्हा आमिर गोलंदाजीसाठी आला. त्या षटकातही तो चेंडूला लाळ लावत होता. ही बाब पंचांनी पाहिली. तेव्हा त्याला ते कृत्य करण्यापासून पंचांनी रोखलं आणि त्याच्याकडून चेंडू घेतला. यानंतर तो चेंडू सॅनिटाइज करण्यात आला. यामुळे काही काळ सामना थांबवण्यात आला होता. या प्रकरणात पंचांनी आमिरला समज दिली.
दरम्यान, आयसीसीने अद्याप याबद्दल अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. उभय संघातील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यात पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंड संघाने १६.१ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १३१ पर्यंत मजल मारली होती. यादरम्यान, पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पंचांना हा सामना रद्द करावा लागला.
हेही वाचा - कोरोनामुळे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची मोडली 'जुनी' परंपरा
हेही वाचा - चेन्नईच्या मराठमोळ्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण