मुंबई - आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड रविवारी होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. या संघात यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीला संघात निवडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार कोहली आणि धोनी चर्चेचा विषय ठरले होते. विराटच्या कर्णधारपदावरुन आणि धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चांना उधाण आले होते. टीम इंडिया विंडीज दौऱ्यात दोन कसोटी व प्रत्येकी तीन एकदिवसीय व टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यापैकी एकदिवसीय आणि टी-20 संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी नवीन खेळाडूंना टीम इंडियात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.
विंडीजविरुद्धच्या मालिकेत कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. विंडीजविरुद्ध 3 ते 8 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.