दुबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर यांनी केलेल्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात विराटने खराब कामगिरी केली. त्याने या सामन्यात शतक झळकावलेल्या पंजाबचा कर्णधार केएल राहुलचे दोन झेल सोडले. तर फलंदाजीतही विराट एका धावेवर माघारी परतला. या कामगिरीनंतर, गावसकरांनी विराट आणि त्याची पत्नी अनुष्का संबधित एक वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर, गावसकर सोशल मीडियावर खूप ट्रोल झाले.
काहींनी गावसकरांना कॉमेंट्री पॅनेलमधून काढून टाकण्याचीही मागणी बीसीसीआयकडे केली आहे. गावसकरांच्या या वक्तव्यानंतर अनुष्काने त्यांना प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली, ''सुनील गावसकर, मला सांगायचे आहे, की तुमचे विधान खूप अप्रिय आहे. मला असे विचारायचे आहे, की तुम्ही अशी विधाने का करता आणि क्रिकेटपटू म्हणून त्याच्या पत्नीला दोष का देता? मला हे चांगले ठाऊक आहे, की तुम्ही गेल्या काही वर्षांत प्रत्येक क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर केला आहे. मग तो माझ्या बाबतीतही झाला पाहिजे, असे तुम्हाला वाटत नाही का?''
अनुष्का म्हणाली, ''मला खात्री आहे, की काल रात्री माझ्या पतीच्या कामगिरीवर बोलण्यासाठी तुमच्या मनात अनेक वाक्ये आणि शब्द आले असतील, किंवा माझ्या नावाचा उल्लेख केल्यामुळेच तुमच्या वक्तव्याला जास्त महत्व मिळत असेल. हे २०२० आहे आणि माझ्यासाठी अजूनही गोष्टी बदललेल्या नाहीत. क्रिकेटमध्ये मला ओढणे आणि अशा प्रकारे एकतर्फी वक्तव्य करणे कधी थांबणार?''
''गावसकर, तुम्ही एक महान क्रिकेटपटू आहात. तुमच्या नावाला क्रिकेटमध्ये उच्च स्थान आहे. जेव्हा तुम्ही माझे नाव घेऊन भाष्य केले, तेव्हा मला कसे वाटले हेच मला सांगायचे होते,'' असेही तिने पोस्टमध्ये म्हटले. या सामन्यात पंजाबने बंगळुरूसमोर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०६ धावा केल्या. तर, विराटच्या नेतृत्वातील बंगळुरूचा संघ १७ षटकात १०९ धावांतच गारद झाला.