रांची - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना उद्या शनिवारी जेएससीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पण या सामन्यासाठी प्रेक्षकांनी पाठ फिरवली असून सामन्याच्या दोन दिवस आधीपर्यंत या सामन्याची केवळ १५०० तिकिटे विकली गेली आहेत. झारखंड राज्य क्रिकेट संघटनेचे सचिव संजय सहाय यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा - 'हे' तीन भारतीय खेळाडू झळकवू शकतात कसोटी त्रिशतक
महेंद्रसिंह धोनीची अनुपस्थिती हे रांचीतील कसोटीसाठी प्रेक्षकसंख्या घटण्याचे प्रमुख कारण सांगण्यात येत आहे. जेएससीए आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियममध्ये ३९,००० सीट्स आहेत. सर्वात स्वस्त तिकिट २०० तर, सर्वात महाग तिकिट २००० रुपयांचे आहे. राज्य संघटनेने पॅरा-मिलिटरी फोर्स, आर्मी, स्थानिक पोलिस आणि नॅशनल कॅडेट कोर्प्स यांना ५००० तिकिटे दिली गेली आहेत.
यंदाच्या मार्चमध्ये या स्टेडियमवर शेवटचा सामना झाला होता. हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आला होता. धोनीच्या संघातील उपस्थितीमुळे स्टेडियम हाऊसफुल झाले होते.