२०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'बबन' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील संवाद ,गाणी, कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. बबन आणि कोमल या जोडीने तर संपूर्ण महाराष्ट्राला स्वतःच्या प्रेमात पाडले होते. पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी हीच जोडी एका नव्या रूपात, नव्या ढंगात प्रेक्षकांना भेटण्यासाठी लवकरच येत आहे.
भाऊसाहेब शिंदे ,गायत्री जाधव आणि अर्चना जॉईस यांची प्रमुख भूमिका असलेल्या राजकुमार या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. 'राजकुमार' या चित्रपटाचे दुसरे मुख्य वैशिट्य म्हणजे २०१८ ला प्रदर्शित झालेले के.जी.एफ.( K.G.F.), मुळशी पॅटर्न आणि नाळ या चित्रपटांमधील अर्चना जॉईस , प्रवीण तरडे, देविका दफ्तरदार, श्रीनिवास पोकळे हे कलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसतील.
एस .आर . एफ .प्रोडक्शन प्रस्तुत राजकुमार हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे .या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन समर्थ राज इडिगा यांनी केले आहे. समर्थ यांनी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पहिले आहे. 'राजकुमार' हा समर्थ राज इडिगा यांचा पहिलाच चित्रपट आहे. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करूनही समर्थ यांनी पहिल्या दिग्दर्शकीय पदार्पणासाठी मराठी चित्रपटाची निवड केली आहे. अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतलेल्या समर्थ यांनी आवडीमुळे आणि इच्छेमुळे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.
'राजकुमार' या नावावरून चित्रपटाबद्दलची अचूकता शिगेला पोहचली आहे. या चित्रपटात काय पाहायला मिळणार याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र या चित्रपटाची कथा अद्याप गुलदस्त्यात आहे. आता कथेचं गुपित कधी उलगडत याची उत्सुकता आहे.