मुंबई - दिग्गज आणि प्रख्यात लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची महाभारतावर आधारित चित्रपट कथा लिहिण्यासाठी आमिर खानसोबत चर्चा झाली होती. आमिर खूप दिवसापासून महाभारतावर आधारित पौराणिक चित्रपट मालिका बनवण्याच्या तयारीत आहे.
प्रसाद यांनी 'बाहुबली' या चित्रपटाचे लेखन केले होते. एसएस राजमौली यांच्या विख्यात चित्रपटाचे कथाकार म्हणून त्यांचा लौकिक आहे. के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी 'बजरंगी भाईजान' आणि 'मणिकर्णिका- द क्विन ऑफ झांसी' या चित्रपटांचीही कथा लिहिली होती.
''महाभारत बनवण्याबद्दल माझ्यात आणि आमिर खान याच्यात चर्चा सुरू होती. आम्ही स्क्रिप्टवर कामही सुरू केले होते. त्याबद्दल आता काही भाष्य करणे उचित ठरणार नाही,'' असे विजयेंद्र यांनी म्हटले.
सध्या लॉकडाऊनच्या काळात के. व्हा विजयेंद्र प्रसाद यांनी काही कथा लिहिल्या आहेत.
''लिखान हा माझा आवडीचा प्रांत आहे. मी लिहित आहे. परंतु त्याबद्दल आत्ताच बोलणे खूप लवकर होईल. माझा पुढील चित्रपट आहे आरआरआर.,'' असे ते म्हणाले.
'आरआरआर' या आगामी चित्रपटात तेलुगु स्टार राम चरण आणि ज्यू. एनटीआर यांच्यासह बॉलिवूड स्टार अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी हिंदीसह अनेक भाषांमध्ये जगभर पर्दर्शित होणार आहे.