काबूल - तालिबानने ३ भारतीय अभियंत्यांची सुटका केल्याची माहिती दिली आहे. मात्र, याबदल्यात त्यांनी त्यांच्या संघटनेच्या ११ दहशतवाद्यांची सुटकाही करून घेतली आहे. यापैकी काही जण या संघटनेतील वरच्या पदावरील दहशतवादी सदस्य आहेत. तालिबानचा माजी कमांडर सयेद मोहम्मद अकबर आघा याने ही माहिती दिली.
या अभियंत्यांना एका वर्षाहून अधिक काळ उत्तर अफगाणिस्तानातील बाघलान येथे ओलीस ठेवण्यात आले होते. आघा याने दिलेली माहिती येथील स्थानिक वृत्तसंस्थेने दिली आहे. रविवारी एका अज्ञात स्थळी हे अभियंते आणि दहशतवाद्यांना परस्परांकडे सोपवण्यात आले, असे आघा याने म्हटले आहे.
अमेरिकेचे शांतीदूत झालमे खलिलझाद यांनी तालिबानचा वरच्या पदावरील मध्यस्थ मुल्ला अब्दुल गणी बरदार याची भेट घेतल्यानंतर काही कालावधीतच ही घटना घडून आली. बरदार हा तालिबानी चळवळीचा सहसंस्थापक आणि मागील आठवड्यात इस्लामाबादला भेट दिलेल्या तालिबानच्या प्रतिनिधिमंडळाचा प्रमुख होता.
हेही वाचा - इराकमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्यांनी माध्यम कार्यालयांवर केले हल्ले
इस्लामाबादमध्ये सध्या अंदाजे १.५ दशलक्ष अफगाणी निर्वासित आहेत, अशीही माहिती तालिबानने दिली आहे.
मागील वर्षी मे महिन्यात काबूल येथील भारतीय दूतावासाने येथे काम करणाऱ्या ७ भारतीय अभियंत्यांचे अपहरण झाल्याचे म्हटले होते. हे सर्व अभियंते दा अफगामिस्तान ब्रेश्ना शेरकत (डीएबीएस) मध्ये वीजनिर्मिती मंडळात काम करत होते. त्यांचे बाघलान येथून अपहरण झाले होते. त्या वेळी, कोणत्याही संघटनेने या अपहरणाची जबाबदारी घेतली नव्हती.
अपहरण झालेल्यापैकी एका ओलिसाला मार्चमध्ये सोडण्यात आले होते. मात्र, इतरांविषयी काहीच माहिती मिळाली नव्हती. तीन अभियंत्यांच्या बदल्यात सोडण्यात आलेल्या तालिबानी दहशतवाद्यांमध्ये शेख अब्दुर रहीम आणि मावळावी अब्दुर रशीद यांचा समावेश आहे. यांनी कुनार आणि निर्मोझ या प्रांतांमध्ये बंडखोरांच्या गटाचे नेतृत्व केले होते.
हेही वाचा - नोबेल २०१९ : 'यांना' मिळाला 'शरीरविज्ञान/ वैद्यकशास्त्र' विषयातील नोबेल पुरस्कार!