मुंबई - मराठी मनोरंजनसृष्टीच्या वर्तुळात प्रत्येक कलाकाराला माहित असतं किंवा सांगितलं जातं की अभिनयाचा श्रीगणेशा एकांकिकांमधून करणे गरजेचे असते. एकांकिकांमधून अभिनयाचा पाय मजबूत होतो अशी धारणा आहे. एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'कल्पना एक आविष्कार अनेक' या स्पर्धेचे यंदाचे विषय सूचक आहेत दिवंगत समाजसेविका पद्मश्री सिंधूताई सपकाळ (माई) आणि त्यांनी दिलेला विषय आहे ‘भूक'.
विषय सुचविताना माईंनी स्वतःच्या जीवनाच्या अनुभवांचा उल्लेख केला होता आणि पत्राद्वारे स्पष्टीकरण देताना असं लिहिलेलं की, “माझ्या आजवरच्या जगण्यातून मला हे सांगावस वाटतंय की ‘भूक’ या एका जाणिवेने मला इथवर यायला भाग पाडले आहे. भूक ही फक्त पोटाची असत नाही. ती प्रेमाची, नात्याची, सोबतीची, ज्ञानाची, कुठलीही असू शकते. पण ती जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा अपूर्ण वाटत राहते. ती भावना मी सहन केली आहे आणि माझ्या सोसण्यातूनच मला जगण्याचे बळ मिळाले आहे. मला असं वाटतंय की आपल्या कल्पना एक आविष्कार अनेक या उपक्रमातून ‘भूक’ या जाणिवेकडे जमेल तितक्या कोनातून बघितलं जावं. नवीन आविष्कार साकार केला जावा. आपल्या उपक्रमास माझ्या अनेकानेक शुभेच्छा आहेतच! आपलीच माई - सौ. सिंधुताई सपकाळ.”
हा विषय इतका दैनंदिन आहे की लेखक आपोआप लिहते होतील, असा विश्वास होता त्यांचा. या विषयाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारी एकांकिका या स्पर्धेत स्पर्धकांना सादर करायची आहे. वरवरून सोप्पा वाटणारा पण कठीण असा हा विषय लेखकांसमोर निश्चितच आव्हान असल्याची प्रतिकिया समाजमाध्यमात व्यक्त होते आहे. यंदा या स्पर्धेचे संयुक्त वर्ष ३६ वे असून खुल्या गटासाठी होणाऱ्या या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आवर्जून सहभागी होतात.
'कल्पना एक आविष्कार अनेक' या स्पर्धेत सहभागी होण्याची प्रवेश प्रक्रिया १ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होत आहे. ज्यांना प्रवेश अर्ज हवा असल्यास आपला ई-मेल आयडी astitvateam@gmail.com ह्या ई-मेल वर पाठवावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
हेही वाचा - सिनेसृष्टीतला मैलाचा दगड ठरला 'आयोध्येचा राजा'