ठाणे - संपत्तीच्या वादातून दिराने भावजयीचा गळा आवळून खून ( property dispute Murder of Brothers Wife in thane ) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे भावजयीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दिराचा बनाव पोलीस तपासात समोर आला आहे. ही घटना टिटवाळा नजीक उभारणी गावात घडली असून आरोपी दिराला कल्याण तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुरेश त्र्यंबक वाघे असे अटक केलेल्या दिराचे नाव आहे. तर धृपदा जयराम वाघे (वय ४० वर्षे) असे मृतक भावजयीचे नाव आहे.
शवविच्छेदन अहवालात खून झाल्याचे निष्पन्न -
कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंभारणी गावातील पाण्याच्या टाकीजवळ ६ फेबुवारी रोजी सकाळच्या सुमारास एका ४० वर्षीय महिलेने तिच्या राहत्या घरात गळफास घेतल्याची माहिती स्थानिकांकडून पोलिसांना देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणाची पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला होता. त्यातच या महिलेने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याची कुजबुज परिसरातील नागरिकांमध्ये सुरु असल्याचे समजल्यानंतर या प्रकरणी पोलिसांना सखोल चौकशी सुरु केली. शिवाय शवविच्छेदन अहवालात तिची गाळ आवळून खून झाल्याचे समोर आले होते.
मृतकच्या बहिणीमुळे खुनाचे कारण आले पुढे -
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांना तपासाचे चक्रे वेगाने फिरवत नातेवाईकांची चौकशी सुरु केली. त्यावेळी पोलिसांना माहिती मिळावी की, मृत धृपदा व तिचा दिर सुरेश त्र्यंबक वाघे यांच्यात जमीन- जागेच्या पैशाचे कारणावरून वाद सुरु होता. त्यानंतर पोलिसांनी दिर सुरेशला ताब्यात घेऊन त्याचेकडे सखोल विचारपूस केली. यावेळी त्याने जागा - जमीनचे पैशाचे वादातून त्याच्या भावाची पत्नी धृपदा हिचा गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. तर पोलिसांनी आरोपीला काल सायंकाळी अटक केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विजय सुर्वे करीत आहेत.
हेही वाचा - Rajesh Tope on Wine Sale : वाईनबाबत डॉक्टारांनी सांगितले आहे, प्रमाणात असेल तर योग्य- राजेश टोपे