ठाणे - कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला काल रात्री आठ सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे धुराचे मोठे लोट नागरी वस्तीत पसरल्याने धुराचा त्रास नागरिकांना होताना दिसत असून आगीबाबत माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर पाण्याचा फवारा सुरू केला होता. ही आग १४ तासानंतर आटोक्यात आली आहे.
आग विझण्याऐवजी आणखीच भडकली
कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या खाडी किनारी काल सायंकाळच्या सुमारास सुटलेला वारा आणि कचऱ्यापासून तयार झालेला मिथेन वायू यामुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. मात्र यामुळे आग विझण्याऐवजी आणखी भडकली. या आगीमुळे कल्याण शहराच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर धुराचे साम्राज्य पसरले आहे.
डम्पिंग ग्राऊंडला आग लागते की लावली जाते?
आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपल्याने ते बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. ते न केल्याने २ वर्षांपूर्वी शहरातील बांधकाम परवानग्याही रोखण्यात आल्या होत्या. मात्र पालिकेने न्यायालयात आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करून नवे डम्पिंग सुरू करण्याची हमी देण्यात आल्यानंतर ही बंदी उठली होती. मात्र प्रत्यक्षात अजूनही हे डम्पिंग सुरूच असल्याचे पाहायला मिळत असून त्यामुळे पालिकेने न्यायालयात दिलेला शब्द पाळला नसल्याचे समोर आले आहे. डम्पिंग ग्राऊंडला आग लागते की लावली जाते? असा प्रश्न उपस्थित झाला असून हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
आगीमुळे होणाऱ्या धुराने परिसरातील नागरिक हैराण
महापालिका क्षेत्रात दररोज ६०० ते ६६० मेट्रिक टन कचरा गोळा होतो. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर हा कचरा टाकण्यात येतो. मात्र डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात आल्याने हा कचरा डेपो बंद करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने पालिकेला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने उंबर्डे येथे ३५० मेट्रिक टन व बारावे येथे २०० मेट्रिक टनाचा घनकचरा शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी निविदा काढल्या आहेत. मात्र उंबर्डे आणि बारावेचा प्रकल्प कार्यन्वित होत नाही तोपर्यंत आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद होऊ शकत नाही. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडचा उग्र वास आणि सातत्याने लागलेल्या आगीमुळे होणाऱ्या धुराने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.
अनेक वेळा आगी लागूनही शोध मात्र नाहीच
यतीन वर्षात आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला अनेकवेळा आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. गेल्यावर्षी दोन ते तीन वेळा भीषण आग लागली होती. २०१६मध्येही सहावेळा आग लागल्याचा प्रकार घडला होता. यावेळी लागलेल्या भीषण आगीत कचरा डेपोशेजारी असलेल्या साठेनगर वसाहतीतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून डम्पिंग ग्राऊंडला आग लागली जात असताना त्याचा शोध मात्र प्रशासन अजूनही लावू शकलेली नाही. डम्पिंग ग्राऊंडवर शून्य कचरा मेाहिमेतंर्गत जैव शेतीचा पायलट प्रोजेक्ट राबविला जात आहे, मात्र या प्रोजेक्टसाठी वापरण्यात येणारे सुमारे ७० लीटर द्रावणही चोरून नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या वर्षी घडला होता.