ठाणे - मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा यापुढचा तपास एनआयए करणार आहे. बुधवारी संध्याकाळी मनसुख हिरेन प्रकरणातील अटक आरोपी आणि दस्तावेज एनआयए कडे सोपवण्यात आले. ठाणे न्यायालयाच्या आदेश दिल्यानंतर ही प्रक्रिया राबविण्यात आली.
एनआयए मुकेश अंबानी यांच्या घराजवळील स्फोटक कारचा तपास करत आहे. त्यामुळे याच प्रकरणाशी संबंधित मनसुख हिरेन हत्या प्रकरण असल्याने तपास एनआयए कडे द्यावा अशी मागणी एनआयएने केली होती. या प्रकरणाशी संबंधित दाव त्यांनी ठाणे न्यायालयात केला होता. त्याच्यावर बुधवारी सुनावणी घेण्यात आली. ठाणे न्यायालयाने एनआयएची मागणी मान्य करत एटीएसने हा तपास एनआयएकडे द्यावा असे आदेश दिले. त्यानुसार आता मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयए करणार आहे.
मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास आता पर्यंत राज्याचे दहशतवाद विरोधी पथक करत होते. या केसमध्ये एटीएसने माजी पोलीस विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोर या दोघांना अटक करून या घटनेचा उलगडा केल्याचा दाव केला होता. मात्र, एनआयएकडे द्यावा असा निर्णय झाल्याने हा राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. ठाणे न्यायालयाने मनसुख हिरेन प्रकरणी सर्व कागदपत्रे आणि तपासाचा दस्तावेज एनआयए कडे सोपवावा असे आदेश दिले आहेत. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी एटीएसने अटक केलेले दोन आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांसह कागदपत्र एनआयए पथकाच्या स्वाधीन करण्यात आली. दोन्ही आरोपींना घेऊन एनआयए पथक मुंबईकडे रवाना झाले आहे.