सोलापूर : कोरोनाने अख्या जगाला आपल्या कवेत घेतले आहे. या कोरोना संसर्गाच्या भीतीने स्वत:ची मुले कोरोनाने मरण पावलेल्या जन्मदात्या आई-वडिलांचे पार्थिव स्वीकारण्यास आणि त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यास नकार दिल्याच्या देशात अनेक घटना समोर आल्या आहेत. अखेर पालिका प्रशासनातील कर्मचारी अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडतात. हे विदारक चित्र समोर असताना सोलापुरात माणुसकी जीवंत असल्याचे उदाहरण एका महिला कोरोना वॉरियर्सच्या रुपात समोर आले आहे. कविता चव्हाण नावाची एक धाडसी तरुणी आपल्या टायगर ग्रुपच्या सहकारी मित्रासह कोरोनाने मरण पावलेल्या बाधितांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यासाठी पुढे आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिका प्रशासनाची यंत्रणा कमी पडत आहे. म्हणून सोलापूर मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मदतीसाठी तरुणांना कोरोना वॉरियर्स बनून पुढे येण्याचे आवाहन केले होते. पालिका आयुक्तांच्या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद देत कविता चव्हाण ही धाडसी तरुणी आपल्या सहकारी मित्रांसह पुढे आली. त्यांनी कोरोना बाधिताने मरण पावलेल्या मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शवली. कवितासोबत टायगर ग्रुपमधील तानाजी जाधव, श्रीमंत चव्हाण, केतन देवी, मधुकर कुरापाटी, प्रल्हाद कळसकर, सागर राठोड, अवी पवार या साऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर महापालिकेचे आरोग्य अधिकारी व समन्वयक पांडे यांच्या सूचनेनुसार रुग्णालयातील मृतदेह ताब्यात घेऊन अॅम्बुलन्समधून अंत्यविधीच्या ठिकाणी नेणे व त्या-त्या धर्मानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार हा कोरोना वॉरियर्सचा ग्रुप करत आहे.
तरूणांनी पुढे यावे : कविता चव्हाण
महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मी कविता चव्हाण आणि आमच्या टायगर ग्रुपने कोरोनाग्रस्तांना अंत्यविधीच्या ठिकाणापर्यंत नेण्याची जबाबदारी उचलली आहे. आमचे पथक चांगल्या पद्धतीने काम करत आहे. शहरातील ज्या तरूणांना विविध स्तरावर काम करावयाचे आहे त्या तरूणांनी पुढे यावे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून कोरोनाग्रस्ताने मेलेल्या बाधिताच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची जबाबदारी उचलली असल्याचे कविता चव्हाण यांनी ईटीव्ही मराठीशी बोलताना सांगितले.