सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी(Corona Lockdown) झाल्याने सर्व व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका लग्न सराईला देखील बसला आहे. विवाह समारंभ न करण्याचे आदेश राज्य सरकारने यापूर्वी दिले होते, त्यामुळे घोड्यावरून काढण्यात येणाऱ्या वराती, मिरवणुकींवर बंदी आली होती. पण आता कोरोना महामारीची तीव्रता कमी होत असल्याने शासनाने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. लग्नाच्या वरातीत हळूहळू घोड्यावरून मिरवणुका दिसू लागल्या आहेत. मात्र, आजदेखील या घोडे व्यावसायिकांची(Corona hits Horse Business) परवड सुरू असल्याची खंत या घोडे व्यावसायिकांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे.
- टाळेबंदीत घोड्यासाठी दिवसाला 500 रुपये खर्च केले जायचे-
मार्च 2020 पासून देशात टाळेबंदी लागू करण्यात आली. सर्व बाबी जागच्या जागी थांबल्या होत्या. अनेक वर आणि वधूंचे लग्न रद्द झाले. लग्न सराईवर अवलंबून असलेल्यांना तर या टाळेबंदीचा जबर फटका बसला. लग्न सराईत घोड्यावर वरात काढण्यासाठी अनेकांची हौस असते. लग्णांच्या वरातीवर अवलंबून असलेल्या घोडे व्यावसायिकांना घोड्यांचा सांभाळ करणे अवघड झाले होते. कारण एका घोड्याला दिवसाला कमीतकमी 500 रुपये खर्च होत होता. काहीही उत्पन्न नसताना घोड्यांसाठी चारापाण्याची व्यवस्था करावी लागली. एखाद्या जिवंत प्राण्याला दारासमोर यांनी जीव सोडू दिले नाही. स्वतः उपाशी राहून घोड्यांसाठी पोटभर अन्नाची व्यवस्था केली. एका घोड्याला वर्षाला 50 हजार रुपये खर्च करत सतत त्यांचा सांभाळ केला.
![Horse Business](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-02-special-news-the-affordability-of-showy-horses-continues-during-the-wedding-season-10032_19112021182619_1911f_1637326579_80.jpg)
- शासनाची कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही-
राज्यातील आणि केंद्रातील सरकारने टाळेबंदीत प्रत्येकाला मदत केली. पण मुक्या घोड्यांचा सांभाळ करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळाले नाही. टाळेबंदीचा अनुभव सर्वांना पहिल्यांदाच आला. इतकी परवड होईल याची कुणालाही कल्पना नव्हती. प्रत्येकाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. घोडे व्यावसायिकांनी आपली खंत व्यक्त करताना माहिती दिली की, सरकारने गायी, म्हशी शेळीपालकांना मदत केली. पण आम्हा घोडे व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारचे अनुदान किंवा मदत मिळाली नाही.
![Horse Business](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-02-special-news-the-affordability-of-showy-horses-continues-during-the-wedding-season-10032_19112021182619_1911f_1637326579_229.jpg)
- आता सुगीचे दिवस येतील हीच अपेक्षा -
राज्य शासन किंवा केंद्र शासन टाळेबंदी लागू करणार नाही अशी अपेक्षा प्रत्येक नागरिक व्यक्त करत आहे. कारण यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होते, आणि पूर्वपदावर येण्यासाठी मोठा अवकाश लागतो. प्रत्येक व्यावसायिकाला आपला व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली आहे. हवालदिल झालेले घोडे व्यावसायिक देखील सुगीचे दिवस येतील हीच अपेक्षा बाळगून आहेत.
![Horse Business](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-02-special-news-the-affordability-of-showy-horses-continues-during-the-wedding-season-10032_19112021182619_1911f_1637326579_902.jpg)